प्रतिनिधी/ खेड
लॉकडाऊनमुळे मुंबईतून पायी प्रवास करत गावी येणाऱया चाकरमान्यांचा ओघ अजूनही सुरूच आहे. दिवा-मुंबई येथून सलग 7 दिवस पायी प्रवास करत गावी निघालेले 13जण महामार्गावरील विन्हेरे फाटय़ाजवळ पोलिसांच्या कचाटय़ात अडकले. या सर्वांची वैद्यकीय तपासणी करून क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, शनिवारी आणखी 28 जणांना पोलिसांनी ताब्यात घेत आरोग्य प्रशासनाच्या स्वाधीन केले. त्यांचीही प्राथमिक तपासणी करून क्वारंटाईन करण्याच्या हालचाली सुरू होत्या.
मुंबई, पुणे यासारख्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. याच भीतीने चाकरमानी पायी प्रवास करत गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. लॉकडाऊनमुळे सर्वच ठप्प असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा? याची भ्रांत सतावणाऱया चाकरमान्यांची उपासमार सुरू असल्यामुळेच जीव धोक्यात घालत पायी प्रवास करत आहेत. मात्र कशेडी येथे होणाऱया तपासणीदरम्यान चाकरमानी पोलिसांच्या तावडीत सापडत आहेत. याठिकाणी कडक तपासणी सुरू असल्याने चाकरमान्यांनी कशेडी घाटाला पर्याय असणाऱया विन्हेरे मार्गावरील जंगलमय भागातून प्रवास करण्याची शक्कल लढवली आहे.
विन्हेरे मार्गावरून पायी प्रवास करत गावी येणाऱयांची संख्या दिवसागणिक वाढतच चालल्याने पोलिसांनी याठिकाणी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. दिवा-मुंबई येथून देवरूख, रत्नागिरीच्या दिशेने जाणारे 13 जण सलग 7 दिवस पायी प्रवास करत होते. महामार्गावरील विन्हेरे फाटय़ाजवळ आले असता पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. कामधंदा नसल्याने उपासमार सुरू असल्यामुळेच पायी प्रवास करत गावी जाण्याचा निर्णय घेतल्याचे चाकरमान्यांनी सांगितले. 7 दिवसांच्या प्रवासादरम्यान केवळ बिस्किटे खाऊन दिवस काढल्याचे या चाकरमान्यांनी सांगितले.
शुक्रवारी लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयातील संस्थात्मक विलगीकरण कक्षातील 16 जणांना सोडण्यात आले. याशिवाय परशुराम रूग्णालयात देखरेखीखाली असलेल्या 45 विद्यार्थिनींनाही त्या त्या तालुक्यात धाडण्यात आले असून त्यांन होम क्वारंटाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शनिवारी या कक्षातील आणखी 28 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून याठिकाणी 85 जण देखरेखीखाली आहेत. कळंबणी उपजिल्हा रूग्णालयातील कक्षात देखरेखीखाली असलेल्या 19 पैकी 6 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून 12 जण याठिकाणी निगराणीखाली आहेत.
आजोबांच्या निधनाचे कारण पुढे करत गावी निघालेला तरूण ताब्यात
काकीच्या मृत्यूचा बनाव करणाऱया तरूणास ताब्यात घेण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आजोबांच्या निधनाचे कारण पुढे करत गावी निघालेला राजापूर येथील तरूण पोलिसांच्या तावडीत सापडला. हा तरूण अंबरनाथ-मुंबई येथून राजापूरच्या दिशेने कारने जात असताना कशेडी येथे तपासणीदरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी चौकशी केली. यावेळी आजोबांचे निधन झाल्याचे कारण पुढे करत मोबाईलवरील फोटोही दाखवला. पोलिसांनी खातरजमा केली असता हा जुनाच फोटो असल्याचे निष्पन्न झाले. राजापूर पोलिसांशी संपर्क साधून खात्री करण्यात आली असता या तरूणाचा बनाव उघड झाला. पोलिसांनी आरोग्य प्रशासनाच्या स्वाधीन करत कार जप्त केली आहे. आरोग्य प्रशासनाने वैद्यकीय तपासणी करून त्यास क्वारंटाईन केले आहे.