आठवडाभरात तीन ठिकाणी डल्ला : लक्ष विचलित करून लुटण्यात पटाईत, चेनस्नॅचिंगसाठी चोरीच्या मोटारसायकलींचा वापर
प्रतिनिधी /बेळगाव
प्रकरण 1 (सोमवार दि. 7 फेब्रुवारी 2022)
दुचाकीवरून बेळगुंदीला लग्नाला जाणाऱया जुने बेळगाव येथील शारदा गणपती पाटील (वय 70), पती गणपती पाटील (वय 76) या वृद्ध दांपत्याला गणेशपूरजवळ अडवून पाच तोळय़ांचे दागिने लांबविण्यात आले. पोलीस असल्याचे सांगून दोघा जणांनी हे कृत्य केले.
प्रकरण 2 (सोमवार दि. 7 फेब्रुवारी 2022)
सीआयडीचे अधिकारी असल्याचे सांगून निवृत्त शिक्षणाधिकारी बाळाप्पा बसाप्पा कोडगन्नावर (वय 65) रा. श्रीनगर यांच्या अंगावरील तीन तोळय़ांचे दागिने पळविले. श्रीनगर गार्डनजवळ ही घटना घडली.
प्रकरण 3 (बुधवार दि. 9 फेब्रुवारी 2022)
मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामटय़ांनी दूध घेऊन चालत घरी निघालेल्या कविता उमाशंकर डोळ्ळी (वय 60) रा. महांतेशनगर या महिलेच्या गळय़ातील चार तोळय़ांचे मंगळसूत्र हिसकावले.
गेल्या आठवडय़ात घडलेल्या या तीन घटनांवरून इराणी टोळीतील गुन्हेगार बेळगाव परिसरात पुन्हा सक्रिय झाल्याचे उघडकीस आले आहे. तब्बल सात वर्षांपूर्वी या टोळीने बेळगावात अक्षरशः हैदोस घातला होता. मात्र, बेळगाव पोलिसांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईमुळे सात वर्षांत कधीच ते बेळगावकडे फिरकले नव्हते. आता या टोळीतील गुन्हेगार पुन्हा सक्रिय झाले आहेत.
एखादी गुन्हेगारीची घटना घडली, की त्याच्या स्वरुपावरून या घटनेमागे कोणत्या टोळीचा हात असणार, याचा तपास अधिकारी अंदाज बांधतात. जर घटनास्थळावर ठशांचे नमुने आढळून आले तर काळय़ा यादीतील गुन्हेगारांशी त्याची पडताळणी केली जाते. आता गेल्या आठवडय़ात घडलेल्या तीन घटनांवरून इराणी टोळीचा बेळगावात पुन्हा प्रवेश झाला आहे, हे निश्चित झाले आहे.
सात वर्षांपूर्वी या टोळीच्या कारवायांना बेळगावकर अक्षरशः वैतागले होते. पोलीस दलावरील नागरिकांचा विश्वास उडाला होता. चेनस्नॅचिंग व वृद्ध दांपत्याला गाठून पोलीस असल्याचे सांगून दागिने लांबविण्याचे प्रकार नित्याचे झाले होते. त्यावेळचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना 4 एप्रिल 2015 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस अधिकाऱयांची बैठक बोलवावी लागली होती. कारण बेळगावकरांनी काही तरी करा, अशी तक्रार पालकमंत्र्यांकडे केली होती.
या बैठकीच्या दुसऱयाच दिवशीच इराणी टोळीतील एक गुन्हेगार पोलिसांच्या तावडीत सापडला. माळमारुती पोलीस स्थानकाचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक व सध्याचे सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी त्यांच्यावर हल्ला करून पळून जाणाऱया इराणी टोळीतील गुन्हेगारांवर रामतीर्थनगरजवळ गोळीबार केला होता. त्यानंतर तत्कालीन पोलीस आयुक्त एस. रवी यांच्या मार्गदर्शनाखाली या टोळीची पाळेमुळे खणण्यात आली होती.
शाहरुख फिरोज शेख (वय 32), महम्मदरफिक मेहबूब शेख (वय 60), महम्मद सय्यदनूर इराणी ऊर्फ जाफरी (वय 32), सलीम शेरअली शेख (वय 30), अब्बास चंगेज इराणी (वय 35), हैदर मुसा इराणी (वय 32) सर्व राहणार श्रीरामपूर, जि. अहमदनगर या सहा जणांना 12 ऑगस्ट 2016 रोजी बेळगाव येथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या गुन्हेगारांवर बेळगाव शहरात 33 गुन्हय़ांची नोंद आहे.
गुन्हेगार अहमदनगर जिल्हय़ातील
बेळगाव येथे सक्रिय असलेले गुन्हेगार अहमदनगर जिल्हय़ातील श्रीरामपूर आणि पुणे परिसरातील होते. श्रीरामपूरचा इम्रान इराणी आणि पुण्याच्या अजिमच्या टोळीने बेळगाव परिसरात धुमाकूळ घातला होता. या गुन्हेगारांनी एखाद्या शहरात गुन्हे करायचे ठरविले तर कारमधून येतात. त्यांच्यासाठी त्यांचे साथीदार मोटारसायकल सज्ज करून ठेवतात. तीही चोरीची असते. कोल्हापूरहून बेळगावला येताना निपाणीत त्यांच्यासाठी मोटारसायकल तयार असायची. गुन्हे करून पुन्हा महाराष्ट्रात जायचे. इराणी टोळीतील गुन्हेगार केवळ बेळगावच नव्हे तर देशभरातील वेगवेगळय़ा शहरात सक्रिय आहेत.
नागरिकांनीच दक्षता बाळगण्याची गरज
या टोळीचा म्होरक्मया इम्रान इराणी हा सराईत गुन्हेगार आहे. श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर व पुणे परिसरात या गुन्हेगारांचे वास्तव्य आहे. पणजी येथील पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रभूदेसाई यांना मिळालेल्या माहितीवरून बेळगाव पोलिसांनी इराणी टोळीतील गुन्हेगारांच्या मुसक्मया आवळल्या होत्या. खासकरून पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांचे सहकारी या कामात आघाडीवर होते. आता इराणी टोळीतील गुन्हेगारांनी पुन्हा बेळगावात गुन्हे सुरू केले आहेत. त्यामुळे नागरिकांनीच दक्षता बाळगण्याची गरज आहे.
टोळीतील प्रत्येकाची जबाबदारी ठरलेली!
इराणी टोळीतील गुन्हेगारांची गुन्हे करण्याची पद्धत देशभरात एकसारखीच आहे. मोटारसायकलवरून येऊन महिलांच्या गळय़ातील दागिने लांबविण्यात त्यांचा हातखंडा आहे. याबरोबरच सकाळी घरासमोर झाडलोट करणाऱया महिलांना गाठून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या गळय़ातील दागिने हिसकावण्यात येतात. वृद्धांना गाठून >आपण पोलीस आहोत, सीआयडी विभागात आहोत, पुढे खून झाला आहे. तुमचे दागिने सांभाळा’, असा सल्ला देत रुमालात दागिने बांधून दिल्याचे भासवून ते पळविण्यात येतात. अंगावर घाण पडल्याचे सांगून एखाद्याच्या हातातील पैशांची बॅग पळविण्यात येते. अनेक बँकांमध्येही या टोळीतील गुन्हेगार दबा धरून बसलेले असतात. वृद्धांना रक्कम मोजून देण्याचे सांगून हातोहात रक्कम पळविण्यात येते. त्यांची लुटमारीची आणखी एक जुनी पद्धत होती. एखाद्या कारसमोर 50 किंवा 100 ची नोट टाकायची. कारमध्ये बसलेल्याला बोलावून >अहो मालक, तुमचे पैसे पडले आहेत बघा’ असे सांगायचे. पैशांचा मोह कुणाला नसतो. 50 किंवा 100 रुपये उचलण्यासाठी कारमधील व्यक्ती खाली उतरली की कारमधील बॅग पळविण्यात येते. लक्ष विचलित (अटेंशन डायव्हर्शन) करून सावजाला लुटण्यात इराणी गुन्हेगार तरबेज आहेत. धारवाडमध्ये मोटारसायकल चोरून चेनस्नॅचिंग करण्यासाठी बेळगावला येताना कित्तूरजवळ अपघात होऊन एका इराणी गुन्हेगाराचा मृत्यू झाला होता. टोळीतील प्रत्येकाची कामे ठरलेली असतात. चेनस्नॅचिंगसाठी मोटारसायकल चोरणारा गुन्हेगार केवळ तेच काम करतो. चोरीची मोटारसायकल हातात आल्यानंतर चेनस्नॅचिंग करणारे केवळ तेवढेच करतात. चोरलेल्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असते. अशी पार्श्वभूमी असलेल्या इराणी टोळीतील गुन्हेगारांनी बेळगाव पोलिसांसमोर पुन्हा तपासाचे आव्हान उभे केले आहे.