मुंबई, पुण्यातून आलेले 32 जण संस्थात्मक क्वारंटाईन : बाहेरून येणाऱयांचा शोध घेण्याचे काम सुरू
प्रतिनिधी / सावंतवाडी:
सावंतवाडी तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातर्फे तालुक्यात परजिल्हा आणि पुणे-मुंबई येथून येणाऱया नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. तालुक्यात परजिल्हय़ातून तसेच पुणे-मुंबईतून आलेल्या 32 जणांना संस्थात्मक क्वारंटाईन तर 31 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तालुक्यात बाहेरून येणाऱयांची संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागासमोर आव्हान निर्माण झाले आहे. नागरिकांनी बाहेरून येणाऱयांची माहिती आरोग्य विभागाला द्यावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर यांनी केले आहे.
दरम्यान, आंबा वाहतुकीचा पास मिळाल्यानंतर एजंट आणि आंबा बागायतदाराने चालक व क्लिनरची जबाबदारी घेतली पाहिजे. आंबा वाहतूक झाल्यानंतर आरोग्य विभागाला कळवून त्यांची तपासणी करण्याबरोबरच त्यांना क्वारंटाईन केले पाहिजे. परंतु तसे एजंट आणि बागायतदार करत नाहीत. वाहतूक पास मिळाल्यानंतर सर्व आलबेल असल्यासारखे वागत असल्याने काय करावे, असा प्रश्न आरोग्य विभागाला पडला आहे. परंतु अशा परिस्थितीतही आरोग्य विभाग पुणे-मुंबईतुन आलेल्या चालक – क्लिनर यांची माहिती घेत असल्याचे शिरोडकर यांनी सांगितले.
सावंतवाडी तालुक्यात गेल्या आठवडय़ात मुंबईतून सावंतवाडी-ओटवणे येथे येऊन नंतर भुदरगडपर्यंत प्रवास केलेला ‘कोरोना’ रुग्ण सापडला होता. ओटवणे येथे गरोदर महिलेला सोडून तो गावी गेला होता. भुदरगड तालुक्यातील हा रुग्ण असला तरी तो ओटवणे येथून गेला होता. त्यामुळे आरोग्य विभाग चिंतेत आहे. परंतु सुदैवाने महिलेचा आणि तिच्या घरातील सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे आरोग्य विभागाने नि:श्वास सोडला. आरोग्य विभाग बाहेरून येणाऱयांना संस्थात्मक आणि होम क्वारंटाईन करत आहे. अशांची संख्या 63 आहे. आता वेंगुर्ले-वायंगणी येथील मुंबई येथे आंबा वाहतूक केलेल्या चालकाला कोरोना झाला. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. मुंबईत आंबा तसेच अन्य वाहतूक करून ओलेले चालक व क्लिनर आवश्यक खबरदारी घेत नाहीत. मुंबईतून आल्यानंतर ते गावात फिरत आहेत. वायंगणीत रुग्ण सापडल्यानंतर आता त्याची दाहकता दिसून आली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग अशा लोकांचा शोध घेत आहे.
सावंतवाडी तालुक्यात आता बाहेरून दररोज येणाऱयांची संख्या वाढत आहे. वाहनांची रेलचेल मोठय़ा प्रमाणात सुरू झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला तरी नागरिकांनीही बाहेरून येणाऱयांची माहिती आरोग्य विभागाला द्यावी, असे आवाहन डॉ. शिरोडकर यांनी केले आहे.