यावर्षी आतापर्यंत झालेल्या पावसातही ओल्ड गोवा आघाडीवर असून सतत पडणाऱया या पावसामुळे ओल्ड गोवा गोव्याचे चेरापुंजी बनत आहे. हा विलक्षण बदल सर्वांना आश्चर्यचकित करणारा आहे
मुसळधार पाऊस हे गोव्याचे वैशिष्टय़ आहे. 2009 साली बाराही महिने पाऊस पडला होता. असे कमी अधिक प्रमाणात होतच असते. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पाऊस कोसळत असला तरी डिचोली, सांखळीत कधीकधी होणारी पूरसदृशस्थिती वगळता पूर, महापूर येण्याच्या घटना गोव्यात सहसा घडत नाहीत, कारण हा पाऊस जिथे मिळेल तिथून वाट काढून मांडवी, जुवारी, शापोरा, कुशावती अशा नद्यांमधून शेवटी समुदाला जाऊन मिळतो. या पावसामुळे गोव्याची जमीन सुपिक बनून राहिली असून समुद्राच्या क्षारतेच्या प्रमाणाचाही समतोल राखला आहे, म्हणूनच तर कर्नाटक बांधत असलेल्या कळसा-भंडुरा धरणाला गोव्याचा विरोध आहे. घाटमाथ्यावर कोसळणाऱया पावसाच्या पाण्याचा गोव्यात वापर होत नाही, ते सरळ समुद्रात जात असल्याने वाया जाते, हा कर्नाटकाचा दावा तकलादू आणि अनैसर्गिक आहे.
गोव्यातील पावसाळा फारसा कधी कंटाळवाणा नसतो. उलट गोव्याचे सौंदर्य आणखी खुलून जाते. दऱयाखोऱयांतून कोसळणारे शुभ्रधवल दूधसागर, लाडक्याचो धबधबा, साट्रे, वझरा सकला, नेत्रावळी, मैनापी यासारखे नेत्रदीपक जलप्रपात सर्वांच्या चित्तवृत्ती आपल्याकडे वेधून घेतात. म्हणूनच तर समुद्रकिनारी पर्यटनासाठी जगविख्यात असलेला गोवा कधी पावसाळी, निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध झाला हे कुणाच्या ध्यानीमनीही आले नाही. पावसाळय़ातील हे नयनरम्य, आल्हाददायक, स्फूर्तीदायी वातावरण ‘कॅश’ करण्यासाठी गोव्याने पर्यटनाच्या कक्षा रुंदात ‘गो गोवा 365’ ही संकल्पना रुजवली आणि अल्पावधीतच ती बहरलीही. कधी रिमझिम, कधी धो धो तर कधी धुवाँधार कोसळणारा हा गोव्याचा मनभावन पाऊस आपल्याबरोबर देशविदेशातील पर्यटकांनाही गोव्याकडे घेऊन येतो. सध्या गोव्यासह सर्वत्रच कोरोना महामारीचे सावट असले तरी पर्जन्यराजा दरवर्षीप्रमाणे वाजतगाजत दाखल झालेला आहे.
दरवर्षी साधारणपणे 125 ते 150 इंचपर्यंत पडणारा पाऊस गोव्याला पुरेसा असतो. काहीवेळा 150 च्या वरही झाल्याच्या नोंदी आहेत. साधारणपणे 20-25 वर्षांपूर्वी गोव्यातील पावसाचे प्रमाण काहीसे कमी झाले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून पुन्हा पूर्वीप्रमाणे बरसत आहे. जागतिक उष्णतामानाचा परिणाम गोव्यातील पावसावर झाल्याचे जाणवत नाही. सर्वाधिक पाऊस कोसळायचा तो सत्तरी तालुक्यात. त्यानंतर सांगे, काणकोण तालुक्यांचे क्रमांक लागायचे. या तालुक्यांमध्ये नैसर्गिक जलप्रपात अनेक आहेत. या तीन तालुक्यातील पाऊस आणि गोव्याच्या उर्वरित भागात पडणाऱया पावसाच्या प्रमाणात बरीच तफावत आहे. सत्तरी तालुक्याला गोव्याची चेरापुंजी म्हणून ओळखले जायचे. मात्र गेल्या सात-आठ वर्षांपासून गोव्यातील पावसाच्या कोसळण्यामध्ये विलक्षण बदल झाल्याचे दिसून येत आहे. त्याकडे अजून कुणी विशेष लक्ष दिलेले नाही. सहय़ाद्री घाट परिक्षेत्राच्या बाहेर असलेला, गोव्याचा मध्यभूभाग असलेल्या तिसवाडी तालुक्यातील ओल्ड गोवा या भागात गेल्या अनेक वर्षांपासून सर्वाधिक पाऊस कोसळत आहे. केवळ आठ-नऊ तासात येथे साडेतीन ते पाच इंचपर्यंत पाऊस कोसळतो. यावर्षी सुरु झालेल्या पावसाळय़ातही ओल्ड गोवा आघाडीवर असून सतत पडणाऱया या पावसामुळे ओल्ड गोवा गोव्याचे चेरापुंजी बनत आहे.पावसाळय़ाला धरून झालेला हा विलक्षण बदल सर्वांना आश्चर्यचकित करणारा आहे. गोवा हवामान खाते किंवा राष्ट्रीय वेधशाळेने याकडे लक्ष देऊन संशोधन व नियोजन करण्याची गरज आहे. असा कोणता बदल गोव्याच्या हवामानात झाला आहे की ज्याच्यामुळे ओल्ड गोव्यासारख्या पावसाला विशेष पूरक नसणाऱया भागात आता जोरदार पाऊस कोसळू लागला आहे. आकाराने छोटय़ा असलेल्या मांडवीच्या तिरावर वसलेल्या ओल्ड गोव्यात पुरेशा प्रमाणात झाडे आहेत, मात्र घनदाट जंगलाचे डोंगर नाहीत. ओल्ड गोवा हे गाव तसे घनदाट जंगलाचे, डोंगरदऱयांचेही नाही. अर्धे गाव अन् अर्धे शहरासारखे स्वरुप. समुद्रकिनारी भागापासून 20 कि.मी. अंतरावरील या गावाची रचना उंच, मध्य सपाट आणि सखल अशा तीन भौगोलिक क्षेत्रामध्ये सामावली आहे. मोती नावाचा एकच छोटासा डोंगर असून त्यावर घनदाट जंगल नाही. त्यावर जंगली झाडांऐवजी बागायती झाडे आहेत. काजू, आंबा, फणस, अननस, कोकम, सागवान, वटवृक्ष, पिंपळ, बांबू, माड आहेत. समुद्रावरून सुमारे 20 कि.मी.चा प्रवास करून येणारे ढग ओल्ड गोव्यावरच येऊन कसे कोसळतात हा मोठय़ा पुतूहलाचा प्रश्न आहे. यांचे गांभीर्य ओळखून संशोधन व्हायला हवे. त्या संशोधनाच्या आधारे पुढील नियोजन करायला हवे. यंदाही सुरुवातीपासून ओल्ड गोव्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. गेले सात दिवस सूर्यदर्शन झालेले नाही. एकेकदा कोसळणारा पाऊस 2 ऑक्टोबर 2009 रोजी काणकोण तालुक्यात झालेल्या ढगफुटीची आठवण करून देतो. ढगफुटीने आलेला गोव्यातील सर्वात मोठा तो काणकोणचा पूर होता. तीन माणसे दगावली, हजारो घरे कोसळली, शेती-बागायतीची, गुरांची मोठी हानी झाली होती. ओल्ड गोव्यात पाऊस कितीही पडला तरी पुराची भीती वाटत नाही. मात्र जागोजागी होणारे जमीन उत्खनन, पावसाच्या पाण्याच्या वाटांचा विचार न करता होणारी महाकाय बांधकामे, बुजविण्यात आलेले ओहोळ यामुळे भविष्यात ओल्ड गोव्यात जलप्रलय झाला तर…? स्थानिक ग्रा.पं.ने याबाबत पुढाकार घेऊन राज्य सरकारच्या मदतीने गोव्याच्या चेरापुंजी बनणाऱया ओल्ड गोव्याबाबत संशोधन व नियोजन करणे ही काळाची गरज आहे.
राजू भि. नाईक