ऑनलाईन टीम / पुणे :
एखादा जीवनानुभव लेखकाला भिडल्यानंतर त्याच्या मनात त्याची स्पंदने उमटणे आणि त्यातून त्याला लेखनासाठी प्रेरणा मिळणे ही तशी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे त्यासाठी बराच वेळ लागतो साहित्य निर्मिती ही दुधाचे दही होण्याइतकी जलद प्रक्रिया नाही असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.
चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने द्वारकानाथ शेंडे स्मृत्यर्थ उत्कृष्ट कविता संग्रहासाठी देण्यात येणारा ‘मृदंगी पुरस्कार कवयित्री संगीता बर्वे यांना’ आणि उत्कृष्ट कादंबरीकरिता देण्यात येणारा ‘मनबोलीं’ पुरस्कार लेखक विक्रम भागवत यांना प्रा जोशी यांच्या हस्ते देण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कवयित्री डॉ. संगीता बर्वे, लेखक विक्रम भागवत, साहित्यप्रेमी आयपीएस अधिकारी अनंत ताकवले, अखिल भारतीय प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे उपस्थित होते.
प्रा जोशी म्हणाले, स्फूर्तीची अभिव्यक्ती हेच साहित्याचे प्रयोजन आहे.एकांत हीच साहित्याची उत्थानभूमी आहे. बाहेरचा गोंगाट प्रचंड वाढल्याने अंतरनाद ऐकायला येत नाही अशी सर्वांची अवस्था झाली आहे एकांत आणि एकाग्रता ही मूल्ये आहेत आज ती हरवत चालली आहेत महान साहित्यकृतींची बीजे जीवनातल्या साध्या वाटणाऱ्या अनुभवात सापडतात त्यामुळे साध्या वाटणाऱ्या अनुभवांकडे लेखकांनी दुर्लक्ष करणे योग्य नाही.
संगीता बर्वे म्हणाल्या, ‘अंतःप्रेरणेतून लिहिलं की मनाला शांत वाटतं. कवितेने मला जगायला शिकवलं. जीवनात संगीताची साधना करणारे आणि, कलेची जाण असणारे घर मिळाल्याने लेखनाला उत्तेजन मिळाले.