प्रतिनिधी /पणजी
गोव्यातील दोन प्रसिद्ध कोकणी कवी उदय म्हांबरो आणि संजीव वेरेकर यांना साहित्यसेवेसाठी नुकत्याच प्राप्त झालेल्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांबद्दल मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
म्हांबरो यांच्या ’इंद्रधोणू उदेवं’ या कविता संग्रहास मंगळुरू येथील कोकणी भास आनी संस्कृती प्रतिष्ठानचा प्रतिष्ठेचा विमला पै विश्व कोकणी साहित्य पुरस्कार -2021 प्राप्त झाला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे त्यांना संदेश पाठवून पुढील साहित्य सेवेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
कवी, लेखक वेरेकर यांच्या ’रक्तचंदन’ या कविता संग्रहास साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला असून त्याबद्दल राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यासंबंधी पाठविलेल्या पत्रात श्री. पिल्लई यांनी वेरेंकर यांच्या कविता प्रांतासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव केला असून पुढील साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.