कुटुंब नियोजन मोहिमेचे यश : जि. प. आरोग्य सभापतींची माहिती
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात कुटुंब नियोजनाचे कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्यामुळे जिल्हय़ाचा जन्मदर गेल्या दहा वर्षांत 10.68 वरून 8.77 एवढा खाली आला आहे. यापुढेही जिल्हय़ात लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुटुंब नियोजन करून सक्षम देश घडवूया, असे आवाहन जि. प. च्या आरोग्य व शिक्षण सभापती सावी लोके यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.
10 जुलै मातृ सुरक्षा दिन आणि 11 जुलै लोकसंख्या दिन पाळण्यात येतो. त्यानिमित्त आरोग्य विभागामार्फत जि. प. बॅ. नाथ पै सभागृहामध्ये पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, डॉ. संदेश कांबळे, आरोग्य समितीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी डॉ. कांबळे यांनी माहिती देताना सांगितले की, देशाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे, ही काळाची गरज आहे. तरच देशाची प्रगती होऊ शकते. सुदैवाने सिंधुदुर्ग जिल्हय़ात लोकसंख्येवर चांगले नियंत्रण असून दर हजार लोकसंख्येमागे 2010 मध्ये असणारा 10.68 जन्मदर हा 2020 मध्ये 8.77 एवढा कमी करण्यात यश आले आहे. सर्वात कमी लोकसंख्या असलेला हा जिल्हा आहे. यापुढेही लोकसंख्या नियंत्रणासाठी अशाच पद्धतीने सर्वांनी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच 11 ते 24 जुलै या कालावधीत लोकसंख्या स्थिरता पंधरवडा राबविण्यात येत असून कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
मातृ सुरक्षेलाही प्राधान्य
10 जुलै हा मातृ सुरक्षा दिन साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने जिल्हय़ात विविध उपक्रम राबविण्यात येत असून यापूर्वीच सुरक्षित मातृत्व अभियान, मातृवंदन योजना राबविल्या आहेत. त्यामुळे जिल्हय़ात अर्भक मृत्यू प्रमाण कमी झाले आहे. जिल्हय़ात 99.90 टक्के प्रसुती सरकारी आरोग्य संस्थांमध्ये केल्या जात आहेत. त्यामुळे मातृ सुरक्षेला प्राधान्य देण्यात येऊन जिल्हय़ात लोकसंख्या नियंत्रण व मातृ सुरक्षेसाठी प्राधान्य देऊन सर्वांनी काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.