मुंबई विद्यापीठाच्या उपपरिसर केंद्रामुळे शैक्षणिक विकासाला गती : जिल्हय़ातील 40 हून अधिक महाविद्यालये जोडणार केंद्राशी
संतोष सावंत / सावंतवाडी:
कोकण प्रांत आता खास नव्या शैक्षणिक विकासाची नांदी ठरणार आहे. कोकणात आता मुंबई विद्यापीठाने खास लक्ष केंद्रित केले आहे. रत्नागिरीनंतर सिंधुदुर्ग जिह्यात विद्यापीठाचे उपपरिसर केंद्र (सब कॅम्पस) सुरू होत आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील 40 हून अधिक महाविद्यालयांना याचा फायदा होणार आहे. यातून पदवी, उच्च पदवी व व्यावसायीक अभ्यासक्रमाची दालने खुली होणार आहेत. कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सिंधुदुर्ग जिह्यात उपकेंद सुरू होत आहे. सावंतवाडी नगरपालिकेच्या बाळासाहेब ठाकरे ज्ञानप्रबोधिनी इमारतीत हे उपपेंद्र सुरू होत आहे.
मुंबई विद्यापीठात जवळपास 800 हून अधिक महाविद्यालये आहेत. विशेषतः या मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सिंधुदुर्गाचे सुपुत्र असून त्यांच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिह्यात विद्यापीठाचे उपसमिती परिसर केंद्र सावंतवाडीत सुरू होत आहे. महिनाभरापूर्वी कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी सावंतवाडीत भेट दिली होती आणि त्यावेळी त्यांनी विद्यापीठाचे उपकेंद्र हे सावंतवाडीत उभारण्यात येणार असल्याची घोषणाही केली होती. त्यानुसार ते आता प्रत्यक्षात उतरत आहे. रविवारी 12 सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या उत्सव कालावधीत विद्यापीठाचे उपसमिती परिसर केंद्र सुरू होणार आहे.
तब्बल 35 वर्षानंतर कोकण विभागात रत्नागिरीनंतर सिंधुदुर्ग जिह्यात विद्यापीठाचे उपकेंद्र उपपरिसर नव्या धर्तीवर सावंतवाडी सुरू होणार आहे. सिंधुदुर्ग जिह्यात कुडाळ तालुक्यातील झाराप येथे विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी जागा पाहण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात ते उपकेंद्र सुरू होण्यास विलंब झाला. उपकेंद्रासाठी गेल्या दोन चार वर्षात कणकवली, तळेरे, कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी आदी भागात जागा पाहण्यात आली होती. पण, प्रत्यक्षात सावंतवाडी शहरातच आता या उपपरिसर केंद्रासाठी जागा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे संस्थानकालीन सावंतवाडी शहरात हे विद्यापीठाचे परिसर केंद्र साकारत आहे. सिंधुदुर्ग जिह्यात पहिले-वहिले शैक्षणिक महाविद्यालय सावंतवाडी संस्थानच्या माध्यमातून श्रीमंत शिवरामराजे भोसले यांनी श्री पंचम खेमराज महाविद्यालय साकारले होते. अशा या शहरात हे विद्यापीठाचे केंद्र सुरू होत आहे. उपपरिसर केंद्र व्हावे, यासाठी माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी पालकमंत्री असताना विशेष प्रयत्न केले होते. त्याचबरोबर खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, नीतेश राणे यांनीही प्रयत्न केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गेल्या कित्येक वर्षापासून सिंधुदुर्ग जिह्यात एक शैक्षणिक विकासाच्यादृष्टीने विद्यापीठाचे काही नव्या अभ्यासक्रमांना गती द्यावी यासाठी हे प्रयत्न केले होते.