युनिसेफ, संपर्क संस्थेचा धक्कादायक अहवाल
जान्हवी पाटील/ रत्नागिरी
लहान वयातील मुलींच्या विवाहाचे प्रमाण ग्रामीण भागात घटत असल्याचे आशादायक चित्र समोर येत असतानाच शहरांमध्ये मात्र हे प्रमाण वाढत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये बालविवाहाचे प्रमाण वाढलेल्या देशातील 20 जिल्हय़ामध्ये सर्वाधिक म्हणजे 16 जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सुसंस्कृत व शिक्षणाचा सर्वाधिक प्रसार असलेल्या कोकणतील सिंधुदुर्ग व ठाणे जिल्हय़ाचाही यात समावेश आहे. युनिसेफसोबत काम करणाऱया ‘संपर्क’ या संस्थेने केलेल्या सर्व्हेमधून ही माहिती पुढे आली आहे. या गंभीर प्रश्नाबाबत विधीमंडळ अधिवेशनात दिवसभर स्वतंत्र चर्चा व्हावी अशी विनंती करणारे पत्र ‘संपर्क’ने राज्यातील सर्व आमदारांना दिले आहे.
बालविवाह म्हटले की, उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्ये समोर येतात. मात्र बालविवाहाचे प्रमाण प्रगत महाराष्ट्रातही वाढत असल्याचा धक्कादायक अहवाल ‘संपर्क’ संस्थेने सादर केला आहे. बालविवाह ग्रामीण भागातच नव्हे तर आता शहरांमध्येही होवू लागल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. राज्यात बालविवाह कायदा, स्त्राrयांचे हक्क, शिक्षण याबाबत सातत्याने जागृकता निर्माण केली जात असतानाही बालविवाहाचे प्रमाण वाढतेय हे अतिशय गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. शिक्षणासह सर्वच क्षेत्रात प्रगतीकडे घोडदौड करणाऱया राज्यात अशा घटना आढळतात, नव्हे त्यात वाढ होते हे दुर्दैवी तेवढेच चिंताजनक असल्याचे ‘संपर्क’च्या मृणाल जोग यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना सांगितले.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात महिला दिनानिमित्ताने महिला-बालकांच्या प्रश्नांविषयी दिवसभर चर्चा घेऊन त्यात बालविवाहाचा प्रश्न गांभीर्याने मांडावा अशी विनंती विधानसभाध्यक्ष नाना पटोले, विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, उपसभापती नीलम गोऱहे, आणि महिला बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांना केली असल्याची माहितीही त्यांनी दिली. या मागणीसाठी सर्व लोकप्रतिनिधाही पत्र पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
भंडारा जिल्हय़ातील मुलींमध्ये ही वाढ 5 पटीपेक्षा जास्त आहे. अल्पवयातील मुलग्यांच्या विवाहाचे प्रमाण या जिल्हय़ात 21 पटींनी वाढले असल्याची माहिती मृणाल जोग यांनी दिली. यंदा 8 मार्चला रविवार आहे, तेव्हा 7 मार्चला किंवा त्या अगोदरच्या योग्य दिवशी या तीव्र संवेदनशील विषयाकडे लक्ष वेधायचे आहे. महाराष्ट्रात 30 ते 40 टक्के मुली 18 वर्षाआधीच विवाहित असतात. या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान व पश्चिम बंगाल यांच्यापाठोपाठ लागतो, बालविवाहाचे प्रमाण जास्त असलेल्या भारतातील 70 जिल्हय़ांपैकी 16 जिल्हे महाराष्ट्रात आहेत. अहमदनगर, भंडारा, चंद्रपूर, धुळे, पुणे, सांगली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, मुंबई उपनगर, परभणी, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे आदी जिल्हय़ांचा समावेश आहे. अशा आशयाचे हे पत्र बहुतांश लोकप्रतिनिधींपर्यंत पोहचले आहे. यासंदर्भातील पुढील कार्यवाही लवकरात लवकर होईल, असा विश्वास ‘संपर्क’ ने व्यक्त केला आहे.
8 मार्चच्या निमित्ताने महाराष्ट्रात विधिमंडळाला बालविवाहविरोधी कायद्याच्या कडक अंमलबजावणबाबत आणि सामाजिक प्रबोधनाबाबत काही निर्णय घेवून घोषणा करता येईल. आम्ही युनिसेफसोबत काम करत आहोत. तेव्हा, दिवसभरातल्या चर्चेसाठी माहिती पुरवण्याचे काम आम्ही नक्की करू शकतो असेही ‘संपर्क’ ने आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी मृणालिनी जोग (9820504781), हेमंत कर्णिक (9821550498) लता परब (9768772660) संपर्क संस्था.