प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनचा कालावधी संपला आणि रस्त्यावर वर्दळ वाढू लागली अर्थातच ठिकठिकाणी वाहतूक कोंडीही पूर्ववत होऊ लागली. वाहतुक नियंत्रित करण्यासाठी वास्तविक सिग्नल्स आवश्यक आहेत. परंतु सध्या तरी शहरातील बहुसंख्य सिग्नल्स असून अडचण नसून खोळंबा असेच आहेत.
आरपीडी कॉर्नर, गोवावेस, यंदेखूट या ठिकाणी सातत्याने गर्दी होत आहे. त्यातच रस्यांचे काम सुरू झाल्याने वाहतुक विस्कळीत होत असून, वाहनधारक नियमांचे उल्लंघन करत आहेत. तरूणाई तर बेफाम वाहने हाकत आहेत.
प्रामुख्याने आरपीडी जवळ वाहतुकीची सतत कोंडी होत आहे. परंतु तेथे सिग्नल्स उभे करण्यात आले असून सुद्धा ते कार्यरत नाहीत. त्यामुळे हे सिग्नल्स नेमके कशासाठी उभे करण्यात आले आहेत हा प्रश्न आहे. सदर सिग्नल्स सुरू करावेत अशी विनंती नागरिक करीत आहेत.
वाहतूक कोंडीमुळे पादचारी, वयोवृद्ध, लहान मुले, आणि गर्भवती महिला, दिव्यांग व्यक्ती यांना रस्ता ओलांडणे कठिण होत आहे. किमान त्यांची गैरसोय लक्षात घेऊन सिग्नल्स सुरू करावेत अशी मागणी होत आहे.