मंडोळी येथे होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यास स्थानिकांचा विरोध
प्रतिनिधी/ बेळगाव
नवी दिल्ली येथील निजामुद्दीन परिसरात झालेल्या तबलिग जमातमधून परतलेल्या 24 जणांना शनिवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील आयसोलेशन वॉर्डमधून डिस्चार्ज देण्यात आले असून त्यांना आणखी काही काळासाठी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. मंडोळी परिसरातील नागरिकांनी मात्र आपल्या गावात त्यांना ठेवण्यास विरोध केला आहे. त्यामुळे सायंकाळी तेथून त्यांना हलविण्यात आले.
शनिवारी दुपारी रुग्णवाहिकेतून 24 जणांना मंडोळी रोडवरील सरकारी वसतीगृहाला नेण्यात आले. या परिसरात संशयितांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सुरुवातीपासूनच स्थानिक नागरिकांनी त्याला विरोध केला आहे. शनिवारी रुग्णवाहिका मंडोळी येथे पोहोचताच नागरिकांनी पुन्हा विरोध केला.
बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर, उपनिरीक्षक कृष्णवेनी आदी या परिसरात दाखल झाले. स्थानिक नागरिकांना समजाविण्याचा प्रयत्न झाला. मात्र कोणत्याही परिस्थितीत संशयितांना आपल्या गावात क्वारंटाईनमध्ये ठेवण्यास आपला विरोध राहणार असे नागरिकांनी सांगताच त्याच रुग्णवाहिकेतून संशयितांना तेथून हलविण्यात आले.
आणखी काही दिवस नजर ठेवणार
जिल्हा प्रशासनाने या 24 जणांना नेमके कोठे ठेवले याचा तपशील उपलब्ध झाला नाही. शिमोग्याला पाठविण्यात आलेल्या स्वॅब तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला असला तरी त्यांच्या आरोग्यावर आणखी काही दिवस नजर ठेवण्यात येणार आहे.
‘त्या’ तिघा जणांची प्रकृती स्थिर
दरम्यान बिम्स (बेळगाव वैद्यकीय विज्ञान महाविद्यालय) च्या वैद्यकीय संचालकांनी शनिवारी रात्री एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या तिघा जणांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर बिम्समध्ये वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत. अशी माहिती त्यांनी दिली आहे. याबरोबरच कोरोनाची लागण झालेल्या कॅम्प, बेळगुंदी, व हिरेबागेवाडी येथील तिघा जणांच्या कुटुंबीयांच्या आरोग्यावरही लक्ष ठेवण्यात आले असून त्यांच्या संपर्कात नेमके किती जण आले याचा तपशील मिळविण्यात येत आहे.
गल्लोगल्ली सुरू आहे अडवणूक
बेळगाव व तालुक्यातील तिघा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शुक्रवारी रात्रीपासूनच गल्लोगल्ली बांबू, झाडांच्या फांद्या व इतर साहित्य आडवे टाकून रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासंबंधी शनिवारी सायंकाळी पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार यांनी गल्लोगल्लीचे अडथळे बाजूला काढण्याची सूचना पोलीस अधिकाऱयांना केली आहे.
33 वाहने जप्त
शनिवारी दिवसभरात लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱयांची 33 वाहने पोलिसांनी जप्त केली आहे. शहर व उपनगरात ही कारवाई करण्यात आली असून गुन्हे तपास विभागाचे एसीपी महांतेश्वर जिद्दी यांनी ही माहिती दिली आहे. रविवारीही अनावश्यकपणे रस्त्यावरून फिरणाऱयांची वाहने जप्त करण्याची प्रक्रिया सुरूच ठेवण्यात येणार आहे.
वृत्तपत्र विक्रेत्यांची अडवणूक होणार नाही
लॉकडाऊनच्या काळात वृत्तपत्रांची छपाई व त्याचे वितरण करण्याच्या कामात अडवणूक होणार नाही अशी माहिती पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार यांनी शनिवारी दिली आहे. वृत्तपत्र वितरकांना आतापर्यंत 300 पासेस वितरित करण्यात आले आहेत. तरीही कुठेतरी त्यांची अडवणूक होत असेल तर पोलीस अधिकाऱयांना सूचना देण्यात येईल. वस्तुनिष्ठ बातम्या जनतेपर्यंत पोहोचण्याचे वृत्तपत्र हे प्रभावी माध्यम असून या कामात अडथळे येऊ नयेत, याची दक्षता घेण्यात यावी असे त्यांनी सांगितले.
831 जणांवर नजर
दिल्ली येथील तबलिग जमातच्या कार्यक्रमात भाग घेऊन बेळगावला परतलेल्यांबरोबरच जिल्हय़ात एकूण 831 जणांवर नजर ठेवण्यात आली आहे. यापैकी 253 जणांना 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये तर 33 जणांना आयसोलेशन विभागात ठेवण्यात आले असून 403 जणांनी 14 दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण केले आहे. आतापर्यंत 60 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी तिघा जणांना कोरोनाची लागण झाली असून 51 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. प्रशासनाला आणखी 6 अहवालांची प्रतीक्षा आहे.