प्रतिनिधी/ रत्नागिरी
केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नगारीक नोंदणी (एनआरसी) विरोधात ‘आम्ही भारतीय नागरिक’ तर्फे आयोजित महामोर्चाने सोमवारी रत्नागिरी दणाणून गेली. या भव्य मोर्चात जिल्हाभरातून सुमारे 18 हजार नागरिकानी सहभाग नोंदवला. यात विविध मुस्लीम संघटना व बहुजन संघटनांचा समावेश होता. हा कायदा रद्द होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा व ‘जेल भरो’ चा इशारा मोर्चेकरांनी यावेळी दिला.
‘सीएए’ आणि ‘एनआरसी’ हे दोन्ही कायदे रद्द करण्याची मागणी करणाऱया घोषणांनी आंदोलकांनी रत्नागिरी दणाणून सोडली. शहरानजिकच्या उद्यमनगर येथील चंपक मैदानापासून या महामोर्चाला सुरूवात झाली. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयाला मोर्चाने धडक दिली. मात्र आंदोलकांचे निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी उपस्थित नसल्याने मोर्चेकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
मोर्चाला सुरूवात होण्यापूर्वी विविध नेत्यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये जमिअत उलेमा संघटना महाराष्ट्र अध्यक्ष आसिफ सिद्दीकी, खासदार हुसेन दलवाई, माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर, आमदार हुस्नबानू खलिफे, राष्ट्रवादीचे कुमार शेटय़े, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, बशीर मुर्तुझा, अलिमियाँ काझी, सामाजिक कार्यकर्ते अभिजित हेगशेटय़े, सुरेश भायजे, तानाजी कुळये आदी मंडळी सहभागी झाली होती. या महामोर्चात संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर तालुक्यांतील सर्व धर्मीय नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी सर्वच नेत्यांनी केंद्र सरकारने देशवासियांवर लादलेल्या कायद्याला विरोध केला. या कायद्याने कुणाचही नागरिकत्व धोक्यात येत नाही, असे जर सरकार सांगत असेल तर कोटय़वधी रुपये खर्च करुन हा कायदा आणायची गरजच काय? असा सवाल नेत्यांनी केला आहे. या सभेनंतर चंपक मैदानापासून विराट मोर्चाला प्रारंभ होऊन मारूतीमंदीर पुढे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चेकऱयांचा सहभाग इतका प्रचंड होता की, जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चेकऱयांचे अग्रणी मंडळी पोहचली तरी मोर्चेकऱयांचे अखेरचे टोक मारुतीमंदीर येथेच होते.
‘आम्ही भारतीय नागरिक’ या संघटनेच्यावतीने काढण्यात आलेल्या या मोर्चाच्यावेळी कोणालाही असुविधा निर्माण होणार नाही, किंवा धर्म अथवा व्यक्तीच्या भावना दुखावणार नाही याची काळजी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे मोठय़ा संख्येने जनसमुदाय असूनही मोर्चा शांततेत पार पडला. मोर्चेकऱयानी जागोजागी स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. त्यामुळे सकाळपासूनच शहराच्या मुख्य रस्त्यावर मोर्चाचे वातावरण निर्मिती झाली होती. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहचताच प्रचंड संख्येमुळे जयस्तंभ परिसर फुलून गेला होता. शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाकडे अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्याकडे निवेदन सादर केले. त्यानंतर मोर्चाची सांगता होऊन मोर्चेकरी तात्काळ माघारी परतले. या मोर्चात सर्व समाजातील नागरिक सहभागी असले तरी मुस्लिम बांधवांचा सहभाग लक्षणीय होता.
मोर्चाचे नेटके नियोजन
मोर्चा सुरळीत होण्यासाठी पोलीस यंत्रणेनेही कायदासुव्यवस्थेच्यादृष्टीने काटेकोर नियोजन केले होते. मोर्चेकऱयांनीही त्यासाठी सहकार्य केले. वाहतूक नियंत्रीत करताना पोलीसांना स्वयंसेवकांनीही सहकार्य केले. मोर्चेकऱयांसाठी पाण्याचीही सुविधा विविध संघटनांनी उपलब्ध करून दिली होती. तसेच मोर्चानंतर रस्त्यावर पडलेल्या बाटल्या व इतर वस्तूंचा कचरा कार्यकर्त्यांनी उचलून रस्ता तात्काळ स्वच्छ केला.
केंद्र सरकारवर नेत्यांचे ताशेरे
जर एकाही माणसाला धक्का पोहोचणार नसेल अशी जर सरकारची खात्री असेल तर हे सगळं करण्याचे कारणच काय? असा सवाल डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केला. खासदार हुसेन दलवाई यांनीही केंद्रसरकारवर विश्वास नसल्याचे सांगून जनतेत असंतोष आहे, ही हडेल्ल्प्पी आहे. आज जेएनयू मध्ये घडले त्याला जबाबदार कोण असा सवाल केला. केंद्राच्या धोरणांमुळे मुस्लीम समाजाला असुरक्षित वाटत असल्याचेही मोर्चेकऱयांच्या नेतेमंडळींचे म्हणणे आहे.