काँग्रेसचा संतप्त सवाल उत्तर प्रदेशमधील सामुहिक बलात्कार व हत्येच्या घटनेचा तीव्र निषेध
प्रतिनिधी/ पणजी
भाजप सरकार भारताचे रामराज्य करू पाहात आहे, परंतु ज्या राज्यात सीता सुरक्षित नाहीत तेथे रामराज्य कसे काय येईल, असा सवाल काँग्रेस पक्षाने उपस्थित केला आहे. तसेच आज भाजपच्या प्रत्येक राज्यात महिलांवर प्रचंड अत्याचार होत आहे, सामुहिक बलात्कार करून हत्या करण्यात येत असताना भाजपच्या महिला गप्प का आहेत, असा संतप्त सवाल करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
14 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशात हाथ्रस येथे एका 19 वर्षिय दलित युवतीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत वरील सवाल उपस्थित करण्यात आले. वरीष्ठ काँग्रेस नेते शंभू भाऊ बांदेकर, प्रवक्ते विठू मोरजकर, प्रतिभा बोरकर, आदी पदाधिकारी त्यावेळी उपस्थित होते.
आर्थिक मंदीमुळे महागाईत वाढ झाली हे एकवेळ समजू शकतो, परंतु आर्थिक मंदीमुळे अन्याय, अत्याचार, बलात्कारात वाढ कशी काय झाली, असा सवास श्री. बांदेकर यांनी उपस्थित केला. देशात रोज 87 महिलांवर विविध प्रकारे अत्याचार होतात, अशी राष्ट्रीय गुन्हेगारी नोंदणी वहीतील आकडेवारी सांगते. परंतु 2019 पासून या प्रकारात 7 टक्के वाढ झालेली आहे. ही वाढही आर्थिक मंदीमुळे झाली का? असा सवाल उपस्थित करताना त्यामागील एकमेव कारण म्हणजे या प्रकारांना स्थानिक आणि केंद्र सरकार जबाबदार आहे, त्यासाठी आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करत असून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सरकारने कठोर उपाययोजना हाती घ्याव्या, असे बांदेकर म्हणाले. आर्थिक महागाईमुळे जेथे लोकांचा आत्माच निर्भर राहिलेला नाही, तेथे लोक आत्मनिर्भर कसे बनतील, अशी टीकाही त्यांनी केली.
उत्तरप्रदेशमध्ये घडलेली सामुहिक बलात्काराची घटना देशातील महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत लाजीरवाणी असून त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे, असे प्रवक्त्या बोरकर यांनी सांगितले. केवळ बलात्कार करून न थांबता त्यांनी अमानवी पद्धतीने छळ करून त्यांनी तिचा बळी घेण्याचा प्रयत्न केला. परंतु सुदैवाने ती बचावली आणि कुणाच्या तरी मदतीने दवाखान्यात पोहोचली. तेथे पोलिसांनी तिची जबानी नोंद करून घेतली. त्यामुळे पोलिसांना गुन्हेगारांची नावे समजली. तरीही प्रत्यक्ष गुन्हा दाखल करण्यासाठी एका आठवडय़ाचा कालावधी लावण्यात आला आणि गुन्हा केवळ हत्येचा दाखल करण्यात आला, त्यात बलात्काराचा उल्लेख करण्यात आला नाही. हा प्रकार अनाकलनीय आहे. उत्तर प्रदेश सरकारने याचे उत्तर द्यावे, अशी मागणी बोरकर यांनी केली.
बलात्काराच्या दोन आठवडय़ानंतर सदर युवतीचा दिल्लीतील इस्पितळात मृत्यू झाला. मात्र तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता सरकारने कोणतेही धार्मिक संस्कार न करता पहाटे 2.30 वाजता गुपचूप रित्या एका शेतात नेऊन तिचा मृतदेह स्वतः जाळून टाकला. मुख्यमंत्री योगी यांच्या राज्यात हेच का ते रामराज्य चालते? जेथे सीता सुरक्षित नाहीत, सीतेचे मन काय आहे, तिच्या वेदना काय आहे याचीच जाणीव नसेल तर रामराज्य कशाचे आणता, आणि त्याच्या घोषणा का म्हणून करता, असे अनेक सवाल बोरकर यांनी उपस्थित केले.
विठू मोरजकर यांनीही घटनेचा निषेध व्यक्त करून गुन्हेगारांना कठोर शासन करावे, अशी मागणी केली.