सोनिया गांधींनी लोकसभेत उपस्थित केला मुद्दा : विद्यार्थ्यांना त्या प्रश्नाचे पूर्ण गुण मिळणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा इंग्रजी परीक्षेचा शुक्रवारी एक पेपर झाला. या परीक्षेत देण्यात आलेल्या एका परिच्छेदामुळे विद्यार्थी, पालकांसह राजकीय व्यक्तींनी संताप व्यक्त केला होता. तसेच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी सोमवारी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सीबीएसईच्या परीक्षेतील वादग्रस्त परिच्छेद मागे घेण्यात आला आहे. सीबीएसईने त्याबाबतचे परिपत्रक काढून माहिती दिली आहे. या परिच्छेदावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांना सर्वच विद्यार्थ्यांना पूर्ण गुण देण्यात येणार असल्याचेही सीबीएसईच्या परिपत्रकात म्हटले आहे.
सीबीएसईच्या परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नामुळे विद्यार्थ्यांना धक्काच मिळाला होता. या प्रकरणावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली. राहुल गांधी यांनी याबाबत ट्विटही केले होते. यानंतर अखेर सीबीएसईने तो वादग्रस्त परिच्छेद मागे घेत असल्याची माहिती दिली. महिलांच्या मक्तेदारीमुळे पालकांचा मुलांवरील अधिकार नष्ट झाला. पुरुषाला त्याच्या मूळ स्थानावरून खाली आणण्यासाठी पत्नी आणि आईने स्वतःवरील बंधने पायदळी तुडवल्याचेही त्यात म्हटले होते. या परिच्छेदावर आधारित प्रश्न पेपरमध्ये विचारण्यात आले होते.