कन्नड सक्तीविरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना हिंडलग्यात समितीतर्फे अभिवादन
वार्ताहर/ हिंडलगा
सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी 1956 पासून अनेकांनी आपले आयुष्य पणाला लावले आहे. तर काहीनी आपल्या घराची राखरांगोळी करत हौतात्म्य पत्करले आहे. त्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटकी सरकारकडून होणारा अन्याय दूर करून सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे. यासाठी समितीच्या सर्व नेते व कार्यकर्त्यांनी हेवेदावे बाजूला सारून एकजुटीने कार्य करावे, असे आवाहन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मनोज पावशे यांनी केले.
संयुक्त महाराष्ट्र सीमा समितीच्यावतीने 1 जून 1986 साली पुकारण्यात आलेल्या कन्नडसक्तीविरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समिती व सीमावासियांच्यावतीने हिंडलगा येथे अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. तत्पूर्वी हुतात्मा मोहन पाटील, परशराम लाळगे, भरमाण्णा कदम, भावकू चव्हाण, कल्लाप्पा उचगावकर, मारुती गावडा, शंकर खन्नूकर, विद्या शिंदोळकर यांच्या प्रतिमेला मनोज पावशे, शहर समिती सरचिटणीस किरण गावडे, खानापूर तालुका समिती अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर आदींनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
मनोज पावशे पुढे म्हणाले, सीमाभागातील मराठी भाषिकांवर 1956 पासून सरकारचा अन्याय सुरुच आहे. मातृभाषेसाठी सीमावासियांचा हा लढा सुरू असून न्याय मिळण्यासाठी सीमाप्रश्नाची सोडवणूक होणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी पुन्हा एकदा एकजुटीने लढय़ाला बळकटी देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले, सीमाभागातील एकनिष्ठ जनता आणि समिती कार्यकर्त्यांच्या सक्रियतेमुळेच आज सीमाप्रश्नाच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयात मराठी भाषिकांची बाजू बळकट झाली आहे. कर्नाटक शासनाचा अन्याय झुगारून अनेक लढे उभारण्यात आले. यामध्ये अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत. या सर्वांचे एकच स्वप्न होते ते म्हणजे सीमाप्रश्नाची सोडवणूक. अशा या हुतात्म्यांचे स्वप्न साकारण्यासाठी सीमावासियांचा हा लढा सुरुच राहणार आहे.
या प्रसंगी कार्यकर्त्यांनी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संपूर्ण महाराष्ट्र झालाच पाहिजे, अमर रहे, अमर रहे, हुतात्मा अमर रहे, आदी घोषणा दिल्या.
यावेळी तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर, पिराजी मुचंडीकर, भरमा पाटील, शट्टुप्पा चव्हाण, सुरेश अगसगेकर, अशोक पाटील, सागर पाटील, एन. वाय. चौगुले, शहर समितीचे महादेव पाटील, मेघन लंगरकांडे, सतीश गावडोजी, उल्हास निंबाळकर, श्याम कुडुचकर, सुहास किल्लेकर, ज्ञानेश्वर मण्णूरकर, खानापूर तालुका समितीचे कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, नारायण कार्वेकर, विलास बेळगावकर, प्रकाश चव्हाण, आबासाहेब दळवी, रमेश देसाई, नारायण कापोलकर, विवेक गिरी, प्रभाकर बिर्जे, खानापूर तालुका भूविकास बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील, अमृत पाटील, कृष्णा मन्नोळकर, महादेव घाडी, शिवाजी पाटील, विठ्ठल गुरव, दीपक देसाई, लक्ष्मण कासर्लेकर, अविनाश पाटील, महिला आघाडीच्या रेणू किल्लेकर, अनुपमा कोकणे, माजी महापौर सरिता पाटील, रुपा नावगेकर, रेणू मोरे, रितीका मोरे, शिवसेनेचे प्रकाश शिरोळकर, नंदू केरवाडकर, प्रविण तेजस यांच्यासह शहर व तालुक्यातील समिती कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.