खानापूर तालुका म. ए. समितीच्या बैठकीत कर्नाटक शासनाचा निषेध : न्यायालयीन लढय़ासाठी पाठपुरावा करण्याची मागणी
वार्ताहर /खानापूर
सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला आहे. याचा निषेध म्हणून गेल्या 65 वर्षात महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच सीमाभागातील समस्त मराठी भाषिक बांधवांनी एकीचा लढा देऊन जोपर्यंत सीमाप्रश्न सुटत नाही तोपर्यंत आपली वज्रमूठ कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. आज सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या प्रश्नाचा निकाल हा मराठी भाषिक सीमावासियांच्या बाजूने नक्कीच लागेल, यात शंका नाही. समितीच्या लढय़ाला बळकटी मिळण्यासाठी मराठी भाषिकांनी एकीच्या झेंडय़ाखाली राहणे गरजेचे आहे. न्यायालयीन लढय़ासाठी मध्यवर्तीने आतापर्यंत पाठपुरावा केला आहे. यासाठी मूळ ध्येय समोर ठेवून वेगळी मागणी करणे चुकीचे आहे. अनेकवेळा रस्त्यावरच्या लढाया करूनही सीमावासियांवरील अन्याय दूर करण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकार योग्य भूमिका घेत नाही. त्यासाठीच याचा निषेध दिन म्हणून 1 नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून सीमावासीय पाळत आले आहेत. जोवर न्याय मिळत नाही तोवर सीमावासियांनी एकीचा झेंडा कायम राखावा, असे विचार समितीचे युवा कार्यकर्ते निरंजन सरदेसाई यांनी व्यक्त केले. येथील लक्ष्मी मंदिरात म. ए. समितीतर्फे आयोजित 1 नोव्हेंबर काळय़ा दिनाच्या लाक्षणिक उपोषणात ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष देवाप्पा गुरव होते.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत सचिव गोपाळराव देसाई यांनी करून 1 नोव्हेंबर काळय़ा दिनासंदर्भात आढावा मांडून सभेला सुरुवात केली. बैठकीत माजी सभापती सुरेशराव देसाई, कार्याध्यक्ष मारुती परमेकर यांनी, सीमाप्रश्न न्यायालयात आहे. मध्यवर्ती समितीच्या माध्यमातून यासाठी योग्य पाठपुरावा होत असताना दुसऱया विषयाला धरुन प्रश्न सोडवण्याची मागणी करणे चुकीचे आहे. अन्यायाने कर्नाटकात सीमावासियांना डांबण्यात आल्याने केंद्र व राज्य सरकारचा निषेध त्यांनी नोंदिवला.
यावेळी ता. पं. सदस्य पांडुरंग सावंत म्हणाले, सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असताना आज सीमावासियांचा आशावाद असलेले आघाडीचे सरकार महाराष्ट्रात आहे. माननिय शरद पवार तसेच माननिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह सीमाभागाचे समन्वय मंत्र्यांनी या प्रश्नाकडे कटाक्षाने लक्ष घालावे. तरच या प्रश्नाचा निकाल आशावादी ठरेल, असे विचार मांडले.
या काळय़ादिनी केंद्र व राज्य सरकारचा निषेध करणारी समितीचे अध्यक्ष देवाप्पा गुरव, मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य गोपाळ पाटील, सूर्याजी पाटील, पी. एच. पाटील, रविंद्र पाटील, रणजित पाटील, युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, मध्यवर्ती समितीचे जगन्नाथ बिर्जे, सदस्य पुंडलिक कारलगेकर, सुरेश देसाई, प्रभाकर बिर्जे, राजाराम देसाई, तुकाराम कुलम आदींची भाषणे झाली. यावेळी युवा समितीचे सदानंद पाटील, भूपाल पाटील, मारुती गुरव, विनायक सावंत, राजू चिखलकर, राजू लक्केबैलकर, कृष्णकांत बिर्जे, रवि पाटील, लक्ष्मण चाळगुंडे, मारुती गुरव, बळीराम पाटील यासह अनेकजण उपस्थित होते.