मालोजीराजेंकडे मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
सीमाभागात मोठय़ा संख्येने मराठा समाज राहतो. महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारला जात आहे. महाराष्ट्रातील मराठा आरक्षणामध्ये सीमावासियांचाही विचार होणे आवश्यक आहे. संभाजी राजेनी आरक्षणाची मागणी करताना सीमावासियांचा विचार करावा, अशी मागणी बेळगावमधील मराठा समाजातील व्यक्तींनी मंगळवारी मालोजीराजे छत्रपती यांच्याकडे कोल्हापूर येथे केली.
मालोजीराजेनी चर्चेला सकारात्मक उत्तर देत लवकरच संभाजीराजे व आपण स्वतः बेळगावला येवून चर्चा करण्याचे आश्वासन दिले. महाराष्ट्रातील मराठा समाज हा सीमाभागातील मराठा समाजाच्या पाठिशी असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा समाज एकत्रित राहिल्यास आरक्षण मिळण्यास वेळ लागणार नाही, असेही ते म्हणाले. यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर, इनाम बडस येथील कल्लाप्पा पाटील, पुंडलिक पावशे, कुशल सुंठकर व नागरिक उपस्थित होते.