खानापूर तालुका मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे निवेदन
प्रतिनिधी / खानापूर
सीमाभागातील मराठी शाळा, मराठी माध्यमिक विद्यालय तसेच साहित्य संमेलन भरवणाऱया संघटनाना महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक साहाय्य मंजूर करावे, अशी मागणी करणारे निवेदन महाराष्ट्राचे मराठी भाषा विकास मंत्री सुभाष देसाई यांना मुंबई येथे सादर करण्यात आले. सदर निवेदन खानापूर तालुका मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर यांनी सादर केले. यावेळी त्यांच्यासमवेत खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील, प्रकाश चव्हाण, आबासाहेब दळवी, विवेक गिरी, वासुदेव चौगुले उपस्थित होते. निवेदनात असे म्हटले आहे की, या अगोदरसुद्धा महाराष्ट्र शासनाने सीमाभागातील मराठी शाळा, माध्यमिक विद्यालय तसेच मराठी भाषा उन्नतीसाठी झटणाऱया विविध संस्थांना आर्थिक साहाय्य केले होते. यावर्षी सुद्धा महाराष्ट्र शासनाने आपल्या आर्थिक संकल्पात सीमाभागातील मराठी शाळा-संस्थांना आर्थिक साहाय्य देण्याची तरतूद केली आहे. यासंदर्भात सीमाभागातून प्रस्तावही मागवण्यात आले आहेत. त्यानुसार मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानने खानापूर तालुक्यातील शाळा, संस्थांचे प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठवले आहेत. पण गेल्या दहा महिन्यात आलेल्या कोरोना महामारीमुळे यावर महाराष्ट्र शासनाकडून कोणताही निर्णयही घेण्यात आला नाही. तरी याकडे आपण लक्ष घालून सीमाभागातील मराठी शाळा-संस्थांना तातडीने आर्थिक साहाय्य मंजूर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मंत्री सुभाष देसाई यांनी निवेदनाचा स्वीकार करुन यासंदर्भात शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा केली. आर्थिक साहाय्य कशाप्रकारे द्यावे, यासाठी दोनवेळा बैठका घेण्यात आल्या आहेत. आता पुन्हा अंतिम बैठक घेऊन सीमाभागातील मराठी शाळा संस्थांना आर्थिक साहाय्य मंजूर करू, अशी ग्वाही मंत्री सुभाष देसाई यांनी शिष्टमंडळाला दिली.