प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्यातील सुभाषनगर येथे पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन एका तरुणाने शेजारी रहिवाशांच्या चारचाकींना पेट्रोल ओतून पेटविले. यामध्ये एक चारचाकीचे किरकोळ नुकसान होण्याबरोबर एक दुचाकी जळून खाक झाली आहे. रात्री 12 वाजता ही घटना घडली. वाहने पेटवून सुभाषनगरमध्ये दहशत माजविणाऱ्या श्री उर्फ समर्थ गवळी नामक तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद आहे.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, सुभाषनगर क गट येथे अक्षय तानाजी कांबळे आणि श्री उर्फ समर्थ गवळी या दोघांमध्ये गेल्या दिवसांपासून पूर्ववैमनस्य आहे. गुरुवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास अक्षय आणि समर्थ या दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले. त्यावेळी समर्थ याने परिसरात दहशत निर्माण करण्याच्या हेतूने शेजारी राहणाऱ्या रहिवाशांच्या गाड्या पेटवून दिल्या. चारचाकी मालवाहतूक टेंपासेह दोन दुचाकींवर पेट्रोल ओतून पेटविण्यात आले. यामध्ये एक दुचाकीही जळून खाक झाली आहे.