पाकच्या नौटंकीला जगात कोणतीही किंमत नसल्याचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ
पाकिस्तानने कितीही कांगावा केला तरी जग त्याच्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाही, असा घणाघात भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत पाकिस्तानच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना केला आहे. पाकिस्तानने गुरुवारी परिषदेत बोलताना पुन्हा एकदा काश्मीरचे तुणतुणे वाजविले होते. भारताने शुक्रवारी पाकला खडे बोल सुनावून त्याच्या आरोपाच्या चिंधडय़ा उडविल्या.
पाकिस्तानचा मानभावीपणा आणि दांभिकता यांचा जगाला चांगलाच परिचय आहे. काश्मीरप्रश्नी सातत्याने खोटे बोलून त्याने जगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालविला असला तरी तो सपशेल अयशस्वी ठरला आहे. भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 370 निष्प्रभ करण्याचा भारताचा निर्णय अत्यंत योग्य असून तसे करण्याचा भारताला पूर्ण अधिकार आहे. हा भारताचा अंतर्गत प्रश्न असून पाकिस्तानला त्यावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. तथापि, दुसऱयाच्या व्यवहारात नाक खुपसण्याची पाकिस्तानची जुनी सवय असून आता ही सवय प्रभावहीन ठरली आहे, अशी बोचरी टीका भारताचे प्रतिनिधी अकबरुद्दीन यांनी केली. पाकिस्तान वस्तुस्थितीपासून पळ काढत असून स्वतःचे अपयश झाकण्यासाठी भारतावर हल्लाबोल करीत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
सुरक्षा परिषदेवरही टीका
दहशतवादाचे जागतिकीकरण ही साऱया जगासमोरची समस्या असून तिला लगाम घालण्यात सुरक्षा परिषद अपयशी ठरली आहे. दहशतवादामुळे आंतरराष्ट्रीय शांततेसमोर सर्वात मोठा धोका उभा राहिला असूनही सुरक्षा परिषद त्याकडे दुर्लक्ष करीत आहे, ही चिंताजनक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.