ऑनलाईन टीम / मुंबई :
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपविण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया देणे योग्य नाही. ही कायदेशीर बाब आहे. न्यायालयाच्या अखत्यारीत असल्याने महाराष्ट्रचे महाधिवक्ता, मुंबई पोलीस आयुक्त यांनी बोलणे योग्य आहे. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. न्याय आणि सत्य यासाठी संघर्ष करणारे राज्य आहे. इथे कधी अन्याय झाला नाही. त्यामुळे संपूर्ण निकालपत्र हाती आल्याशिवाय मत व्यक्त करणे योग्य नाही.
पुढे ते म्हणाले, मुंबई पोलिसांनी त्यांचा तपास अत्यंत प्रामाणिकपणे केला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभे करणे हे एक षडयंत्र आहे. मुंबई पोलिसांची जगभरात प्रतिष्ठा आहे. तरीदेखील आपल्याच राज्यातील नेते मुंबई पोलिसांना बदनाम करत आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट म्हटले.