प्रतिनिधी / आजरा
ज्येष्ठ पत्रकार व शिवभक्त शिक्षक सु. रा. देशपांडे यांचे कार्य आजरा तालुक्यापुरते मर्यादीत नव्हते. भुदरगड तसेच चंदगड तालुक्यातही त्यांनी काम केले आहे. भुदरगड तालुक्यातील पेठशिवापूरच्या शाळेसाठी केलेले काम, चंदगड तालुक्यातील इसापूर रस्त्याचे केलेले काम हे सर्वांना प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याची स्मृती चिरंतन जपण्यासाठी भुदरगड उपविभागात त्यांच्या नावे ग्रंथालय सुरू करण्याची ग्वाही आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली. सु. रा. देशपांडे यांच्या तृतीय स्मृतीदिनाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते डॉ. नवनाथ शिंदे यांना सु. रा. देशपांडे स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते.
स्वागत समीर देशपांडे यांनी केले. विलास देशपांडे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात डॉ. सागर देशपांडे यांनी सु. रा. देशपांडे याच्या शैक्षणिक, पत्रकारीता आणि सामाजिक कार्याचा आढावा घेतला. पुरस्कार प्राप्त डॉ. शिंदे यांच्याही सामाजिक कार्याची माहिती त्यांनी दिली. यानंतर माजी खासदार प्रदीप रावत यांच्या हस्ते डॉ. शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर स्नेहलता देशपांडे यांच्या हस्ते सौ. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
आमदार राजेश पाटील यांनी सु. रा. देशपांडे यांच्यासोबतच्या आठवणी जागवल्या. शिक्षा म्हणून चंदगड तालुक्यात या शिक्षकाची बदली झाली. इसापूर सारख्या गावात ज्ञानदानाचे काम करीत असताना तानाजी मालुसरेंच्या पारगडचा इतिहास प्रकाश झोतात आणल्याचे सांगितले. सभापती उदयराज पवार यांनी देशपांडे यांचे कार्य आजच्या पिढीला मार्गदर्शन असल्याचे सांगितले.
सत्कारानंतर बोलताना डॉ. शिंदे म्हणाले, ज्येष्ठ पत्रकार व हाडाचा शिक्षक असलेल्या सु. रा. देशपांडे यांनी आपल्याला कार्यप्रवण करणारे प्रेम दिले. अ. रा. तोरो, प्रा. विठ्ठल बन्ने व सु. रा. देशपांडे यांनी आपणाला जटानिर्मुलन मोहिमेची प्रेरणा दिल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. आपण केलेल्या सामाजिक कामाच्या मोबदल्यात जनतेने मला भरभरून प्रेम दिले आहे, या प्रेमाच्या कर्जातून उतराई होणं अशक्य असल्याचे सांगून आजच्या पुरस्काराने पुन्हा नव्याने काम करण्याची ऊर्जा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
माजी खासदार रावत म्हणाले, सु. रा. देशपांडे हे कर्मयोगी मनुष्य होते. त्यांचे कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविताना चांगल्या कार्याचा गौरव करण्याचा हा देशपांडे कुटुंबियांचा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले. प्रथा, परंपरा व रूढींमध्ये गुरफटून न राहता विज्ञानवादी दृष्टीकोन ठेवून सत्य स्विकारायला हवे. सत्य कल्पनेपेक्षा अदभूत असल्याचे त्यांनी सांगितले. भौतिक संपत्तीबरोबरच नैतिक संपत्ती वाढल्याशिवाय देश प्रगत होऊ शकत नसल्याचे सांगताना त्यांनी जपानने कशा प्रकारे प्रगती केली याची सविस्तर माहिती दिली.
यावेळी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, जिल्हा परिषद सदस्य जयवंतराव शिंपी, ऍड. शैलेश देशपांडे, प्रा. सुनील शिंत्रे, जनार्दन टोपले, मुकुंदराव देसाई, रचना होलम, सुधीर कुंभार, शकुंतला सलामवाडे, सुधीर मुंज, तुषार बुरूड, राजेंद्र ठाकुर, मारूती मोरे, रशिद पठाण, निवृत्ती कांबळे, अब्दुल नेसरीकर, आप्पासाहेब देसाई, पी. एल. हरेर, नामदेव नार्वेकर यांच्यासह नागरीक उपस्थित होते.