पंतप्रधान मोदींचे विश्वसमुदायाला आवाहन, अमेरिकेच्या ‘डेमॉक्रसी’ परिषदेत सहभाग
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सोशल मिडिया आणि क्रिप्टोकरन्सी यांच्या संदर्भात जागतिक नियम आणि निकष प्रस्थापित करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरुन या दोन्ही बाबी लोकशाहीचे सामर्थ्य वाढविण्यास कारणीभूत ठरतील आणि त्यांच्यापासून कोणताही धोका राहणार नाही, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडन यांनी आयोजित केलेल्या ‘डेमॉक्रसी’ परिषदेत केले आहे.
शुक्रवारी त्यांनी या परिषदेसमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भाषण केले. या भाषणात त्यांनी भारताची लोकशाही आणि निवडणुका यासंबंधी सविस्तर विवेचन केले. लोकशाही ही केवळ लोकांसाठी, लोकांची आणि लोकांकडून चालविलेली व्यवस्था नसून ती लोकांसह चालविलेली यंत्रणा असते. बहुस्तरीय निवडणुका, स्वायत्त न्यायव्यवस्था आणि मुक्त मिडिया ही लोकशाहीची महत्वाची साधने आहेत. तथापि, लोकशाहीचे खरे सामर्थ्य जनतेच्या मनात असलेली आस्था आणि भावना ही आहे. भारतात स्वातंत्र्य मिळाल्यापासून लोकशाही असून मुक्त आणि न्यायोचित वातावरणात निवडणुका घेण्याचा अनुभव भारतापाशी भरपूर आहे. हा अनुभव इतरांना देण्याची भारताची तयारी आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
जागतिक निकष आवश्यक
सोशल मिडिया आणि क्रिप्टोकरन्सी हे नवे तंत्रज्ञान आहे. मात्र, या तंत्रज्ञानाच्या उपयोगासंबंधी जागतिक पातळीवर निकष आणि नियम निर्माण करण्याची आवश्यकता आहे. तसेच त्याच्यावर नियंत्रण ठेवणारी एक मध्यवर्ती यंत्रणा असणेही तितकेच महत्वाचे आहे. तसे झाल्यास या तंत्रज्ञानाचा उपयोग लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी केला जाऊ शकतो. अन्यथा त्यांचा लोकशाहीला धोकाही होऊ शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
जगातील सर्वात मोठी लोकशाही
भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था असून या व्यवस्थेचे प्रतिनिधित्व या परिषदेत करताना मला विशेष आनंद आणि अभिमान वाटत आहे. लोकशाहीची भावना हा आमच्या नागरी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी प्रथमच स्पष्ट करुन आपल्या भाषणाचा प्रारंभ केला.
पारतंत्र्यही निष्प्रभ
भारत अनेक दशके पारतंत्र्यात होता. तथापि, त्यामुळे लोकशाहीची भावना मारली गेली नाही. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही भावना पुन्हा उचंबळून आली. गेली 75 वर्षे याच भावनेच्या आधारावर आमच्या राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया सुरु आहे. या प्रक्रियेत सर्व समाजघटकांचा आर्थिक आणि सामाजिक स्तरावर सहभाग आहे. आरोग्य, शिक्षण आणि मानवविकास या क्षेत्रांमध्ये आमचा सतत विकास याच पायावर होत आहे. लोकशाही फलद्रूप झालेली आहे, होत आहे आणि भविष्यातही होत राहील, हाच संदेश भारताकडून जगाला मिळला आहे. परिणामी, भारत एक समर्थ लोकशाही राष्ट्र म्हणून नावारुपाला आहे आहे. जगालाही यापासून प्रेरणा घेता येईल, अशी भलावण त्यांनी भाषणात केली.
परिषदेचा उद्देश
ही परिषद अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडन यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली आहे. जगात लोकशाही व्यवस्था समर्थ व्हावी आणि एकाधिकारशाही मानणारे नेते आणि देश यांच्यावर लोकशाही राष्ट्रांचा वचक रहावा, या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन अमेरिकेने केले आहे. या परिषदेत फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, इस्रायल इत्यादी देशांसह अनेक लोकशाही देशांचा समावेश होता. मात्र, चीन आणि रशिया यांनी या परिषदेवर टीका केली असून अमेरिका लोकशाही राष्ट्रांना शस्त्रसज्ज बनवत असल्याचा आरोप चीनने केला आहे. रशियानेही परिषदेच्या उद्दिष्टांवर संशय व्यक्त केला आहे. भारताचा सहभाग परिषदेसाठी महत्वाचा ठरला आहे.
लोकशाहीच्या बळकटीसाठी…
ड अमेरिकेचे अध्यक्ष बायडन यांच्या पुढाकाराने परिषदेचे आयोजन
ड जगातील लोकशाही राष्ट्रांनी एकजुट दाखविण्याचे केले आवाहन
ड आधुनिक तंत्रज्ञानावर नियंत्रणासाठी जागतिक यंत्रणा आवश्यक
ड भारताच्या अनुभवाचा इतर देशांनाही होऊ शकतो मोठा फायदा