नवी दिल्ली
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्र सुरू होण्यापूर्वी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रविवारी पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक घेतली आहे. व्हर्च्युअल माध्यमाद्वारे आयोजित या बैठकीत जी-23चे नेते आनंद शर्मा आणि मनिष तिवारी देखील सामील झाले. बैठकीला मल्लिकार्जुन खर्गे आणि अधीर रंजन चौधरी बैठकीत उपस्थित होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी संरक्षण मंत्री ए.के. अँटनी आणि जयराम रमेश यांनीही या बैठकीत भाग घेतला आहे. बैठकीत संसदेत सरकारची कोंडी करण्याच्या रणनीतिसंबंधी विचारविनिमय करण्यात आला आहे. यात शेतकरी आंदोलन, इंधनाचे वाढते दर आणि बेरोजगारीच्या मुद्दय़ावरही चर्चा झाली आहे. काँग्रेस सातत्याने या मुद्दय़ांवरून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱया सत्रातही आक्रमक भूमिकेत दिसून येणार असल्याचे संकेत यातून मिळाले आहेत. तर बैठकीपूर्वी राहुल गांधी यांनी हमीभावावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. उपजीविका अधिकार आहे, उपकार नाही असे राहुल यांनी ट्विट करत म्हटले आहे.