पहिली ते बारावीपर्यंतच्या वर्गांचा समावेश ; तीन लाखांवर विद्यार्थ्यांची उपस्थिती
प्रतिनिधी/सांगली
जिल्ह्यात महिन्यापासून एकाच टप्प्यात शाळा सुरु होत्या. पालकांची संमतीने शाळा सुरु करण्यात सांगली जिल्ह्याने राज्यात बाजी मारली आहे. मात्र, उद्या सोमवारपासून जिल्ह्यातील पहिली ते बारावीच्या तीन हजार नियमित सुरु होणार असून तीन लाख विद्यार्थी शाळेत जातील. शाळेत शंभर टक्के उपस्थितीची सक्ती केली नसल्याने शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात पहिली ते बारावीपर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या शाळा 1774, खासगी प्राथमिक 460, खासगी प्राथमिक व माध्यमिक 712 शाळा आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागल्यानंतर काही भागात शाळा सुरु करण्यात येत आहेत. राज्यात सर्वप्रथम शाळा सुरु करण्यात सांगली जिह्याने आघाडी घेतली. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये लातूर जिह्यात शाळा सुरु होत्या. त्यांचा आदर्शावर जिह्यातील काही गावांनी पालकांच्या संमतीने शाळा सुरु होत्या. मात्र, त्याला विरोध होईल म्हणून त्याचा गाजावाजा शिक्षण विभागासह शिक्षक आणि संघटनानीही केलेला नव्हता. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, माध्यमिक शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे, आरोग्य विभाग विभागांनी 31 ऑगस्टला पालकांच्या संमतीने शाळा सुरू करण्याच्या आदेशा दिले होते. त्याला जिह्यात चांगलाच सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
राज्य सरकारने पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा 4 ऑक्टोबरपासून नियमित सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. जिह्यातील कोरोना स्थिती सध्या नियंत्रणात आहे. बाधितांची संख्या शंभरापर्यंत, तर मृतांची संख्या सरासरीही घटली आहे. अनेक गावे कोरोनामुक्त आहेत. त्यामुळे पालक मुलांना शाळेत पाठवताना सकारात्मक विचार करत आहेत. जिल्हा परिषद, खासगी, नगरपालिका शाळा व्यवस्थापन समित्यांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. जूनमध्ये शाळा सुरु झाली होती. त्यावेळी पहिली ते बारावीची पटसंख्या सर्वसाधारण 2 लाख एक हजार होती. त्यात सुधारणा झाली असून ती आता 2 लाख 25 हजारापर्यंत पोहोचली आहे.
मागील दीड वर्ष शाळा सुरू नसल्याने, वेगवेगळ्या परिस्थितीतून गेल्याने मुलांना भावनिक आधाराची गरज आहे. त्यामुळे 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू झाल्यावर लगेच अभ्यास, परीक्षा, अभ्यासक्रमाची पूर्तता याकडे न वळता किमान एक दोन आठवडे मुलांशी मुक्त संवाद साधावा. मुलांना मन मोकळे करू द्यावे, मित्रांशी संवाद साधू द्यावा. त्यासाठी शिक्षकांना मुलांचे समूपदेशक, हितचिंतक, मित्र व्हावे लागेल. अशा सूचना राज्य शासनाच्या वैद्यकीय कृती गटाकडून देण्यात आल्या आहेत.