कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडवत खरेदी : नागरिकांना परिस्थितीचे गांभीर्य कधी येणार?
प्रतिनिधी / बेळगाव
विकेंड लॉकडाऊन संपला आणि पुन्हा सोमवारी बाजारपेठेसह इतर ठिकाणी गर्दीच गर्दी दिसून आली. ‘येरे माझ्या मागल्या’ या उक्तीप्रमाणे बाजारात गर्दी झाली. कोरोना महामारीमुळे अनेकजण मृत्युमुखी पडत असताना नागरिक मात्र आपल्या खरेदीलाच अधिक महत्त्व देतानाचे चित्र दिसून आले. सोमवार उजाडताच बाजार गाठण्यात आला आणि मनाजोगी खरेदी करण्यात आली. कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडवत ही खरेदी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिक कधी गांभीर्य घेणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
कोरोनाबाबत जनतेला कोणतेच गांभीर्य नाही. पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावून नाकाबंदी केली. मात्र, बेळगाव शहराकडे येणारा लोंढा पाहता या जनतेला सांगूनही काही फायदा नाही, कारण यांना कोणतेच गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे, अशा प्रतिक्रिया पोलिसांनी दिल्या आहेत. आम्ही किती म्हणून समजवायचे, जनतेने स्वतःची काळजी स्वतः घेणे गरजेचे आहे. मात्र आपल्याच तोऱयात खरेदी करण्यासाठी जनता येत आहे.
काही दिवस भाजी किंवा इतर जिन्नस मिळाले नाहीत म्हणून काही बिघडणार नाही, असे असताना खरेदीसाठी गर्दी होत आहे. खरोखरच हे दुर्दैवी आहे. जेव्हा कोरोना होतो आणि रुग्णालयात जाऊन मनुष्य झोपतो, तेव्हाच त्याला अक्कल येणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे. सध्याची परिस्थिती पाहता बेळगावच्या जनतेला कोरोनाबाबत कोणतीच भीती नसल्याचे दिसून येत आहे. केवळ जिल्हा प्रशासनाविरोधात बरळणे याव्यतिरिक्त कोणतीच दक्षता जनता घेत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे तज्ञ व जाणकारांतून जनतेबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.