दिवसेंदिवस कोरोनाच्या एकापाठोपाठ एक शोकांतिका समोर येऊ लागल्या आहेत. अहमदाबदहून पायी गोंदियाला निघालेल्या एका मजुराने वर्धा जिह्यातील गिरड गावाजवळच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली तर छत्तीसगडहून तेलंगणपर्यंतचे अंतर एका बारा वर्षांच्या मुलीने चालत पार केले आणि हैदराबाद येण्यापूर्वीच दहा-बारा किलोमीटर अगोदर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर निदान महाराष्ट्रात तरी एक चांगली गोष्ट घडून येत आहे. टाळेबंदीच्याच काळात आंतरजिल्हा प्रवास काही अपवाद वगळता, खुला होत आहे. तसेच परप्रांतीय मजुरांना हळूहळू का होईना, मुंबई, नाशिक व अन्य ठिकाणांहून आपापल्या राज्यात पाठवले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच देशात प्रथम स्थलांतरित मजुरांसाठी खास रेल्वे सोडण्याची विनंती केली होती. त्याचवेळी म. जोतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जनतेला खासगी रुग्णालयात कोरोनावर मोफत उपचार देण्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना काही खासगी रुग्णालयांकडून वारेमाप दर आकारले जात आहेत. याला लगाम घालण्याच्या हेतूने राज्य शासनाने हा धाडसी निर्णय घेतला आहे. मात्र जगाच्या स्तरावर कोव्हिड-19 या महामारीवर उपाय योजण्याचे काम जागतिक आरोग्य संघटना किंवा डब्लूएचओ करत आहे. डब्ल्यूएचओची स्थापना 1948 साली झाली. परंतु त्याच्याही आधी जवळपास 100 वर्षांपूर्वी, म्हणजे 1851 साली पॅरिसमध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय सॅनिटरी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद त्यानंतर 70-80 वर्षे भरत होती. त्या अनुषंगानेच कॉलरा, प्लेग आणि पीतज्वर या साथीच्या रोगांना लगाम घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय करार झाले. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर, 1945 साली युनो किंवा संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली. त्यावेळीच जगातल्या आरोग्यविषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी संघटना स्थापण्याचा विचार सुरू झाला. नवनव्या आजारांची माहिती मिळवणे, ती जनतेपर्यंत पोचवणे, साथींबद्दल विविध देशांना सावध करणे, लस व उपचारांबद्दल संशोधन करणे आणि आरोग्य प्रश्नांचा सामना करण्यासाठी निधिसंकलन करणे ही कामे डब्लूएचओतर्फे केली जातात. अशा सुसंघटित उपाययोजनांमुळेच देवी, पोलिओ याचे उच्चाटन झाले. इबोलावरील लस तयार करण्यात आली. क्षय, मलेरिया, इबोला, एड्स, कर्करोग, हृदयविकार, नशामुक्ती, मानसिक आरोग्य आणि पोषक आहार व अन्नसुरक्षा अशा विविध क्षेत्रात डब्लूएचओचे काम चालते.
आयसोलेशन व क्वारंटाइन हे शब्द आताच चर्चेत आले असले तरी संसर्ग झालेल्या व्यक्तींना अलग ठेवण्याचे महत्त्व प्राचीन काळापासून लोकांना पटले होते. 14व्या शतकात अशा विलग्नवासाची व्यवस्था भूमध्य समुद्रावरील बंदरात होती. विलग्नवासामुळे रोगांचा प्रसार नेहमी थांबेच, असे नाही. कारण त्याकाळी रोगप्रसाराच्या कारणांचे ज्ञानच अपुरे होते. निरनिराळय़ा देशांतील बंदरात विलग्नवास व्यवस्था वेगवेगळी असे. तसेच त्याकरिता केलेले कायदेही एकाच प्रकारचे नसत. त्यामुळे व्यापार-उदीमात बाधा येई. 1852 पासून या कायद्यांच्या एकसूत्रीकरणाचे प्रयत्न झाले. परंतु विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सूक्ष्मजंतुशास्त्राची भक्कम पायावर स्थापना होऊन, रोगप्रतिबंधाच्या मूलतत्त्वांबद्दल बरेचसे एकमत होईपर्यंत या कामी विशेष प्रगती झाली नाही. विलग्नवासविषयक नियमांमुळे साधारण एकसूत्रीपणा आल्यानंतर, या कार्यासाठी एखादी आंतरराष्ट्रीय यंत्रणा असावी, असा विचार प्रबळ झाला. 1902 मध्ये अखिल अमेरिकन आरोग्य संस्था स्थापण्यात आली. 1909 मध्ये पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य कार्यालय स्थापण्यात आले. ही संस्थाच पहिली जागतिक स्वरूपाची संस्था असून, ती 1947-50 च्या दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेत विलीन झाली.
जगातील कोणत्याही देशाला या संघटनेचे सभासद होता येते. जागतिक आरोग्य संघटनेचे तीन विभाग आहेत. 1) जागतिक आरोग्य सभा. ही वर्षातून एकदा भरते. 2) कार्यकारी मंडळ. हे धोरणांची अंमलबजावणी करते व अर्थसंकल्प तयार करते. 3) प्रमुख संचालकांच्या हाताखालील सचिवालय. आज समस्त भारतवासियांना अभिमान वाटावा अशी गोष्ट म्हणजे, सौम्या स्वामिनाथन या डब्लूएचओच्या प्रमुख वैज्ञानिक या पदावर कार्यरत आहेत. गेल्या वषीच त्यांची या पदावर नियुक्ती झाली आणि त्याआधी त्या तेथे कार्यक्रम विभागाच्या उपमहासंचालक पदावर कार्यरत होत्या. इतक्मया मोठय़ा पदावर व आंतरराष्ट्रीय स्तरावर एक भारतीय महिला अत्यंत जबाबदारीने काम करत आहे, ही खरेच आनंदाचीच बाब आहे. सौम्या या भारतीय हरित क्रांतीचे जनक एम. एस. स्वामिनाथन यांच्या कन्या आहेत. त्यांची आई मीना या प्रसिद्ध शिक्षणतज्ञ आहेत. सौम्या यांच्या कन्या मधुरा या बेंगलोरच्या इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूटमध्ये अर्थशास्त्राच्या प्राध्यापक आहेत. तर दुसऱया कन्या नित्या या युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँग्लिया येथे जेंडर ऍनॅलिसिस अँड डेव्हलपमेंट या विषयाच्या प्राध्यापक आहेत. सौम्या या एम. डी. असून, पूर्वी त्यांनी ब्रिटनमधील लायसिस्टर विद्यापीठात लहान मुलांच्या श्वसनरोगविषयक विभागात रिसर्च फेलो होत्या. गेल्या काही दिवसात सौम्या या टेलिव्हिजन चॅनेल्सवरून कोरोनाबाबत लोकांचे प्रबोधन अत्यंत सोप्या भाषेत करून देत आहेत. गेली तीस वर्षे क्षय आणि एचआयव्हीबद्दल त्या संशोधन करत आहेत. तसेच भारत सरकारमध्ये त्या आरोग्य संशोधन सचिव होत्या आणि 2015-17 या काळात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) महासंचालक म्हणून त्यांनी काम केले आहे.
सौम्या यांच्या मते, कोरोनाचे संकट दीर्घकालीन असण्याची शक्मयता आहे आणि केवळ टाळेबंदी किंवा लॉकडाऊन हा त्यावरील रामबाण उपाय नाही. तो तसा ठरण्यासाठी त्याला अन्य उपाययोजनांची जोडही देणे आवश्यक आहे. चीनमध्ये लॉकडाऊननंतरही कुटुंबातल्या कुटुंबात संसर्ग सुरूच राहिला. त्यामुळे चीनने लक्षणे दिसणाऱया प्रत्येकाची चाचणी घ्यायला सुरुवात केली. ज्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली, त्यांना स्वतंत्र ‘फॅसिलिटी’मध्ये ठेवण्यात आले आणि त्यांच्याशी ज्यांचा संपर्क आला असेल, अशा व्यक्तींना स्वतंत्र क्वारंटाइन फॅसिलिटीमध्ये ठेवण्यात आले. थोडक्मयात, हाऊस क्वारंटाइनमधून फॅसिलिटी क्वारंटाइनमध्ये हलवण्यात आले. भारतालाही अशा गोष्टींचा विचार करावा लागेल. कारण लोक जर गर्दीच्या ठिकाणी राहत असतील, तर त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होण्याचा धोका मोठा असतो, असे सौम्या सांगतात. डब्लूएचओच्या संशोधनानुसार, लक्षणे नसलेल्या लोकांकडून होणाऱया कोरोना संसर्गाचे प्रमाण फक्त 10 ते 15 टक्के आहे. सौम्या यांनी नोंदवलेले एक निरीक्षण मला खूप महत्त्वाचे वाटले. मास्कमुळे तो घालणाऱयाचे नव्हे, तर इतरांचे संरक्षण होते. अनेक अभ्यासांमधून असे दिसून आले आहे की, मास्क घालणाऱया व्यक्ती स्वतःच्या चेहऱयाला अधिकवेळा स्पर्श करतात. म्हणूनच मास्क घातला, म्हणजे आता काही प्रश्न नाही, असे समजण्याचे कारण नाही, असे सौम्या म्हणतात. चीनने लॉकडाऊन केलाच, पण त्याचबरोबर घरोघरी जाऊन तपासणी केली. संशयित रुग्णांना अलग ठेवून, मोठय़ा प्रमाणात उपचार केले. ते ज्यांच्या संपर्कात आले, त्यांच्यावर नजर ठेवण्यात आली. चीनने रोगनिदान चाचण्यांचे आणि देखरेखीचे काम प्रचंड प्रमाणात केले. महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी डेटा किंवा माहिती हे सर्वात महत्त्वाचे अस्त्र आहे, असे मतही सौम्या यांनी व्यक्त केले आहे. मला स्वतःला असे वाटते की, कोरोनाच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांतून नुसत्याच राजकीय चर्चा झडण्याऐवजी, सार्वजनिक आरोग्याविषयी लोकांचे भान वाढवावे यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करणे, संशोधकांना पाचारण करणे हे महत्त्वाचे आहे. सौम्या स्वामिनाथन यांच्यासारख्या अत्यंत बुद्धिमान आणि सामाजिक व वैज्ञानिक उत्तरदायित्वाचे भान असलेल्या व्यक्ती देशाला व जगाला प्रकाशाची वाट दाखवू शकतील.
नंदिनी आत्मसिद्ध