इंजिनियर उतरला चिरमुरे फुटाणे विकायला. कष्टाला सन्मान देण्याची भावना
सुधाकर काशीद / कोल्हापूर
याचे नाव सुजय सुरेश कानकेकर. शिक्षण बी ई इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर. भावाचे नाव अक्षय सुरेश कानकेकर. शिक्षण हॉटेल मॅनेजमेंट पदवी. म्हटलं तर दोघेही एखादी नोकरी करत कुटुंबाला हातभार लावू शकले असते, पण यांनी ठरवलं, शिक्षण झालं म्हणजे नोकरीच केली पाहिजे असे काही नाही. छोटासा का होईना आपला व्यवसाय करायचा. आणि त्यात आपला एक वेगळा ब्रॅन्ड तयार करायचा. आणि त्यासाठी त्यांनी एक परंपरागत व्यवसाय निवडला तो म्हणजे चिरमुरे फुटाणे शेंगदाणे विकायचा. इंजिनीयर पदविकाधारक पोरं आणि चिरमुरे फुटाणे विकायचा प्लॅन करतात ही कल्पनाच अनेकांना न पटण्यासारखी होती. पण या दोघांनी ठरवलं, जग काय म्हणायचं ते म्हणू दे. आपण आपल्या आयुष्याचा एक वेगळाच स्टार्टअप घ्यायचा. आणि आज त्यांची एकाची दोन दोनची तीन चिरमुरे फुटाने विकण्याची दुकाने झाली आहेत. एक इंजिनियर ब्रँड म्हणून त्यांच्या चिरमुर्याची एक वेगळी ओळख त्यातून तयार झाली आहे.
सुजय, अक्षय या उच्चशिक्षित भावा भावांची आणि त्यांच्या पाठीशी राहणाऱ्या त्यांच्या सुरेश कानकेकर या वडिलांच्या वाटचालीची ही कथा आहे. सुरेश कानकेकर यांचे लक्ष्मीपुरी रविवार पेठ बँकेजवळ 1995 पासून चिरमुर्याचे दुकान आहे. त्यांनी हा व्यवसाय करत आपल्या मुलांना शिकवले. कारण चिरमुरे फुटाने विकणे हे किरकोळ समजणारेच अनेक जण आजूबाजूला वावरत असल्याचे त्यांनी पाहिले होते. त्यामुळे त्यांनी मुलांना शिक्षणात गुंतवण्याचे ठरवले.
सुजय व अक्षय ही दोन्ही मुले चांगल्या गुणाने शिकली. सुजय तर इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर झाला. अक्षय मोठ्या इन्स्टिट्यूटमधून हॉटेल मॅनेजमेंटचा पदवीधारक झाला. काही काळ दोघांनी नोकरी केली पण त्यांच्या लक्षात आले, नोकरीत काही भवितव्य नाही. त्यामुळे त्यांनी गुणवत्तेचा अधिक टच देत आपला चिरमुरे फुटाणे विक्रीचा व्यवसाय करायचा त्यांनी निर्णय घेतला.
त्यांनाही करताना अनेकांनी वेड्यात काढले पण दोघे ठाम. त्यांनी पहिल्यांदा मराठा बँकेजवळ व नंतर पाचगाव मध्ये चिरमुरे फुटाणे शेंगदाणे विक्रीचे दुकान काढले. गुणवत्ता व दर्जा यावर अगदी ठरवून भर दिला. आणि चुरमुरे फुटाणे विक्रीत त्यांनी आपला वेगळा ब्रॅण्ड तयार केला. आज एक इंजिनीअर मुलगा चिरमुरे फुटाने विकतो हा कोल्हापुरात खूप कौतुकाचा विषय ठरला आहे. आणि नोकरीच्या मागे लागलेल्या असंख्य तरुणांना त्याने एक चांगला वेगळा मार्ग घालून दिला आहे.
इंजिनीयर असून चिरमुरे फुटाणे विकणे हे लोकांना पटत नाही. पण इंजिनिअरिंग शिक्षणाची शिस्त व अचूकता याचा फायदा मला या माझ्या व्यवसायात नक्कीच होतो. प्रत्येक तरुणाला नोकरी मिळेल हे येथून पुढे कदापि शक्य नाही. त्यामुळे आपल्या परंपरागत व्यवसायात तरुणांनी पडावे. त्यासाठी अजिबात लाजू नये. कारण आपले घर चालवायला बाहेरचा कोणी येत नाही. आम्हाला या वाटचालीत वडील सुरेश, मामा मनोज, रंगराव पाटील आई मंगल , मामा मनोज ,पत्नी दीपीका ,वहिनी रिया यांचे पाठबळ लाभले.