प्रतिनिधी/ बेळगाव
स्टेट बॅंक ऑफ इंडियातर्फे वाहन व गृहकर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी या मेळाव्याचे उद्घाटन झाले असून बुधवारी मेळाव्याची सांगता होणार आहे. खानापूर रोड, कॅम्प येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयात हा मेळावा सुरू आहे. या मेळाव्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
मेळाव्याचे उद्घाटन कॅन्टोन्मेंट बोर्डचे सीईओ श्री बर्चस्वा यांच्या हस्ते झाले. यावेळी स्टेट बॅंक हुबळीचे उपमुख्यव्यवस्थापक पियुष भट हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना सीईओ श्री बर्चस्वा म्हणाले, कोरोनानंतर देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी स्टेट बँकेचा मोठा वाटा असून अशा कर्ज मेळाव्यातून अर्थ व्यवस्थेला बळकटी मिळेल, असे त्यांनी सांगितले. गृहकर्जाचे अधिग्रहण (टेकओव्हर) आणि टॉपअप कर्जाची व्यवस्था या मेळाव्यात करण्यात आली आहे. यावेळी ग्राहकांना गृहकर्जाविषयीचा सल्ला, तात्काळ संमती व मुख्य मान्यतापत्रही देण्यात आले.
या मेळाव्यात वाहन प्रदर्शनही होत असून त्यात 10 वाहन विपेत्यांनी वाहनांचे प्रदर्शन भरविले आहे. या कमी व्याजदराच्या आणि कमी मासिक हप्त्याच्या कर्जाचा लाभ प्रत्येकाने घ्यावा, असे आवाहन बँकेच्यावतीने करण्यात आले आहे.