वार्ताहर/ कराड
लॉकडाऊन व पावसाळ्याच्या काळात छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या मैदानाची दुरवस्था झाली होती. याबाबत लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी पालिका प्रशासकीय अधिकाऱयांसोबत स्टेडियमची पाहणी करून मैदानाची तातडीने दुरूस्ती करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. याची दखल घेत पालिका प्रशासनाच्या वतीने तातडीने स्टेडियमच्या मैदानाच्या दुरूस्ती व स्वच्छतेचे काम सुरू केले आहे. यामुळे खेळाडूंमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
स्व. पी. डी. पाटील यांच्या दूरदृष्टी व संकल्पनेतून छत्रपती शिवाजी स्टेडियमची निर्मिती झाली आहे. कराड शहरासह परिसरातील अनेक खेळाडू या स्टेडियममध्ये सरावासाठी येत असतात. तर वर्षभरात अनेक क्रिकेटचे सामने येथे होतात. मात्र लॉकडाऊनमुळे जवळपास आठ महिने स्टेडियम बंद ठेवण्यात आले होते. पावसाळ्याच्या काळात मैदानात मोठय़ा प्रमाणात गवत उगवले होते. तर क्रिकेटच्या पीचचेही नुकसान झाले होते. लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणल्यानंतर छत्रपती शिवाजी स्टेडियम खुले करण्यात आले आहे. मात्र मैदानाची दुरवस्था झाल्याने खेळडूंना खेळता येत नव्हते.
याची दखल घेत लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी स्टेडियमला भेट देऊन पाहणी केली. यावेळी खेळाडू हणमंत घाडगे, मंजीत आतार, धनाजी हिनुकले, मेहबूब शेख, अविनाश काटरे, मनोज यादव, जटाप्पा, जयंत बेडेकर, नगरपालिकेचे अधिकारी ए. आर. पवार, देवानंद जगताप आदींची उपस्थिती होती. मैदानात मोठय़ा प्रमाणात वाढलेले गवत व पीचवर खड्डे पडल्याचे निदर्शनास आले. यावर सौरभ पाटील यांनी तातडीने मैदानाची दुरूस्ती व साफसफाई करण्याच्या सूचना दिल्या. यावर पालिकेच्या वतीने तत्काळ दुरूस्तीच्या कामास सुरुवात केली आहे. याबद्दल खेळाडूंनी समाधान व्यक्त केले आहे.