दुर्लक्षामुळे गेल्या पाच वर्षांपासून रस्त्याचे काम रखडले
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेने विविध विकासकामे हाती घेऊन शहराचा विकास करण्याचा प्रयत्न चालविला आहे. संपूर्ण शहराचा विकास झाला. मात्र महत्त्वाच्या म्हणून ओळखल्या जाणाऱया स्टेशन रोडकडे दुर्लक्ष झाले आहे. रेल्वे खात्याच्या दुर्लक्षामुळे गेल्या पाच वर्षांपासून रस्त्याचे काम रखडले असून या रस्त्याचे भाग्य केव्हा उजळणार? अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
शहराच्या विकासासाठी कोटय़वधी निधीचा विनियोग करून रस्त्यांचे डांबरीकरण तसेच गटारींचे बांधकाम करण्यात आले आहे. पाटील गल्ली रोडचेही रुंदीकरण करून विकास साधण्यात आला. शहर आणि उपनगरांतील काही प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. मात्र स्टेशन रोडच्या विकासासाठी महापालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड या स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. शहरातील इतर रस्त्यांप्रमाणे स्टेशन रोडदेखील शहरवासियांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. रेल्वेने येणाऱया प्रवाशांसाठी हा रस्ता सोयीचा आहे. यामुळे रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी करण्यात येत आहे. पण या रस्त्याचे डांबरीकरण गेल्या पाच वर्षांपासून
रखडले आहे.
येथील काही परिसर महापालिकेच्या आणि कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कार्यक्षेत्रात येतो. स्टेशन रोड रेल्वे खात्याच्या कार्यक्षेत्रात येतो. यामुळे रस्त्याचे डांबरीकरण कोण करणार? हा वाद गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. परिणामी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम रखडले असून नागरिकांचे हाल होत आहेत.
समस्यांबाबत खासदारांना कोणतेच सोयरसुतक नसल्याची टीका…
या रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात आहे. पण याकडे लोकप्रतिनिधींसह सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे. वास्तविक पाहता हा रस्ता रेल्वे खात्याच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने रेल्वे खात्याकडून परवानगी मिळवून रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रयत्न खासदारांनी करण्याची गरज आहे. पण नागरिकांच्या समस्यांबाबत खासदारांना कोणतेच सोयरसुतक नसल्याची टीका नागरिक करीत आहेत. यामुळे स्टेशन रोडचे भाग्य केव्हा उजळणार? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.