बेळगाव /प्रतिनिधी :
शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या पाटील गल्ली स्टेशन रोडवरील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यास स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. रविवारी आरोग्य खात्यातर्फे हॉटेलमध्ये क्वारंटाईनसाठी प्रयत्न सुरू असताना नागरिकांनी याला विरोध दर्शविला. परिसरातील महिलांनी एकत्र येत या भागात क्वारंटाईन नकोच, अशी भूमिका घेतली. दरम्यान, संतप्त नागरिक व पोलिसांमध्ये वादावादी झाली. नागरिकांच्या विरोधाची दखल घेऊन लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनेनंतर निर्णयात बदल करण्यात आला.
क्वारंटाईन व्यक्तींना शहरातील हॉटेल, लॉजमध्ये ठेवण्यात येत आहे. मात्र, अशा संशयित व्यक्तींचा सर्वसामान्य नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या भागात क्वारंटाईन करून नये, अशी भूमिका नागरिकांनी घेतली. या ठिकाणी रुग्णांना ठेवले तर नागरिकांना धोका निर्माण होईल, अशा संतप्त भावना प्रकट करून नागरिकांनी क्वारंटाईन करण्यास विरोध केला.
रविवारी दुपारी या ठिकाणी आरोग्य खात्याच्या पथकाने क्वारंटाईन करण्यास आणले असता त्याला परिसरातील नागरिकांनी एकत्र येत विरोध केला. पाटील मळा, पाटील गल्ली, मुजावर गल्ली, भांदूर गल्ली, कांगली गल्ली, ताशिलदार गल्ली परिसरात लहान मुले, वयोवृद्धांसह रहिवासी मोठय़ा संख्येने राहतात. त्यामुळे या भागात क्वारंटाईन व्यक्तींना ठेवू नये, अशी मागणीही परिसरातील नागरिकांनी लावून धरली.
स्थलांतरासाठी लोकप्रतिनिधींच्या सूचना
नागरिकांनी या ठिकाणी क्वारंटाईन मंडळींना ठेवण्यासंदर्भात प्रखर विरोध दर्शविला. त्यामुळे याची दखल लोकप्रतिनिधींनी घेतली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी आणि आमदार अनिल बेनके यांनी येऊन परिस्थिती जाणून घेतली. नागरिकांच्यादृष्टीने विचार करून त्यांचे स्थलांतर करण्याची सूचना आरोग्य विभागाला केली. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.