महाभारतात पितामह भीष्म हे इच्छामरणी होते. भगवान श्रीकृष्णांनी त्यांना भगवान विष्णुंच्या रूपात दर्शन दिले आणि त्यावेळी पितामह भीष्मांनी श्रीविष्णुसहस्त्रनाम स्तोत्राने त्यांची स्तुती केली. श्रीविष्णुसहस्त्रनामात भगवान विष्णुंची सहस्त्र नाव आहेत. त्यात ‘विश्वं’ हे एक नाव आहे. याचा अर्थ असा आहे की ‘संपूर्ण विश्वाचे कारणरूप असलेला’. तसेच ‘अक्षोभ्य’ या नावाचा अर्थ असा आहे की, ‘कोणाकडूनही विचलित न होणारा’.
मनुष्यजीवन जगत असताना आपला अनेकांशी संपर्क आणि संबंध येतो. या संपर्क आणि संबंधांमुळे एकप्रकारचे आपले छोटेखानी विश्व निर्माण होते. त्यात भाव-भावना, विचार, संवेदना यांच्या माध्यमातून आपण जगत असतो. आपल्या संपर्कातील व्यक्तींमुळेच आपण आनंद, सुख, दुःख यांचा अनुभव घेत असतो. बऱयाचवेळेला आपण आपल्याभोवती निर्माण झालेल्या विश्वातच रममाण झाल्याने आपली विचारशक्ती ही सीमित झालेली असते. जसे जसे आपण आपले विश्व विस्तारत नेतो तसे तसे आपण अधिकाधिक वैचारिकदृष्टय़ा प्रगल्भ होत जातो. आपल्या विश्वाचा विस्तार जर आपल्याला करायचा असेल तर आपण जीवनात विशाल दृष्टिकोन ठेवूनच इतरांशी व्यवहार करायला हवा. संकुचित मानसिकता ही आपल्याला क्षणिक बनवते. पण, जर आपण स्वतःच्या मानसिकतेत बदल घडवला तर मात्र आपण वैश्विक होऊ शकतो. औद्योगिक क्षेत्रात किंवा व्यावसायिक जीवनात ज्यांना नेतृत्व करायचे असते त्यांनी स्थुलातून सूक्ष्माकडे जाण्याचा प्रयत्न करावा. व्यवस्थापन शास्त्रानुसार जे सकारात्मक नेतृत्व असते ते त्यांच्या सहाय्यकांना विश्वासात घेऊन, त्यांना प्रकल्पाची नीट माहिती देऊन, प्रकल्पाची जबाबदारी पार पाडत असताना अनेकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेऊन, स्वतःसहित इतरांना कामासाठी प्रोत्साहित करून घेताना सकारात्मक गोष्टींचा उपयोग करून घेणे या सर्व पद्धतींचा अवलंब करते. सकारात्मक नेतृत्वाला सुरुवातीचा काळ हा अतिशय खडतर असला तरीही त्या नेतृत्वाचा प्रभाव दीर्घकाळापर्यंत औद्योगिक संस्थेला जाणवतो. त्याऐवजी, जे नकारात्मक नेतृत्व असते त्यांचे व्यस्थापनशास्त्रातील महत्त्व अत्यंत कमी दर्जाचे असते. कारण, त्यात प्रकल्पातील सहाय्यकांवर सतत दडपण आणले जाते, सहाय्यकांच्या अपेक्षा, त्यांच्या प्रतिक्रिया आणि समस्यांचा विचार केला जात नाही. सहाय्यकांवर अचानक निर्णय लादले जातात, एखाद्या छोटय़ाशा चुकीसाठी त्यांना दोषी धरले जाते, ज्या औद्योगिक संस्थेत किंवा उद्योग समूहात कामगार, कर्मचारी, पर्यवेक्षक आणि व्यवस्थापक हे प्रशिक्षित नसतात तेथे नकारात्मक नेतृत्व आपोआप उदयाला येते. जेव्हा असाधारण परिस्थिती निर्माण होते त्यावेळी मात्र औद्योगिक संस्थेचे अस्तित्व टिकवण्यासाठी नकारात्मक नेतृत्व उपयोगी ठरू शकते. परंतु, या नकारात्मक नेतृत्वाचा परिणाम मात्र घातकच ठरतो. जेव्हा एखाद्या औद्योगिक संस्थेचा आकार मोठा होत असतो, कर्मचाऱयांची संख्या वाढत असते, संस्थेतील कार्याचे स्वरूप हे गुंतागुंतीचे बनत जाते, त्यावेळी मात्र व्यवस्थापकांना प्रत्येक कर्मचाऱयाशी व्यक्तिगत स्तरावर चर्चा करता येत नाही. अशावेळी मात्र व्यवस्थापक हे लिखित स्वरूपात औद्योगिक संस्थेतील कर्मचाऱयांशी संवाद साधतात. व्यवस्थापन शास्त्रात सर्वोत्तम व्यवस्थापक हे स्थुलातून सूक्ष्माकडे कशाप्रकारे प्रवास करतात याचे वर्णन श्रीसमर्थांनी चंचळनदी निरुपण समासात असे म्हणतात की,
मृद भूमी तुटोन गेल्या । कठीण तैश्याचि राहिल्या ।
ठांई ठांई उदंड पाहिल्या । सृष्टीमध्ये ।।येक ते वाहतचि गेले । येक वळशामधें पडिले ।येक सांकडीत आडकले । अधोमुख ।।येक आपटआपटोंच गेली । येक चिरोडचिर्डोंच मेलीं ।कितीयेक ते फुगलीं । पाणी भरलें ।।येक बळाचे निवडले । ते पोहतचि उगमास गेले ।उगमदर्शनें पवित्र जाले । तीर्थरूप ।।
07-08-09-10/07/11 याचा अर्थ असा आहे की, नदीच्या काठावरील मृदू भूमी वाहून जाते, परंतु काठावरील कठीण जमीन तशीच राहते. विश्वात ठिकठिकाणी अशा जमिनी आढळतात. मायानदीच्या या प्रवाहात बरेचसे जीव हे वाहत जातात आणि नाश पावतात. अत्यंत थोडे जीव उगमाकडे पोहत जाऊन ब्रह्मदर्शनाने पावन झाले. काही आपटून मेले, काही चिरडून मेले, काही पोटात पाणी शिरून मेले. काही जीव बलवान असल्याने प्रवाहाच्या उलट दिशेने जाऊन उगमास पावले आणि तीर्थरूप झाले. व्यवस्थापनशास्त्राच्या दृष्टीने याचा अर्थ असा आहे की, जे नकारात्मक नेतृत्व असते ते उद्योग समूहातून लवकरच दूर जाते. पण, जे सकारात्मक नेतृत्व असते ते मात्र कितीही कठीण परिस्थिती असली तरीही स्वतःचे अस्तित्व संस्थेत टिकवून ठेवते. औद्योगिक समूहात किंवा एखाद्या उद्योगसंस्थेत बरेचसे व्यवस्थापक हे स्वतःच्या अवगुणांमुळे प्रगती करू शकत नाहीत परंतु, जे सकारात्मक नेतृत्व असते ते मात्र मूळ व्यवस्थापनशास्त्र समजून घेऊन सर्वोत्तम व्यवस्थापक बनतात. व्यवस्थापनक्षेत्रात अनेक व्यवस्थापक हे उत्तम असूनही परिस्थितीमुळे किंवा त्यांच्या हातून घडलेल्या चुकांमुळे मागे पडतात. परंतु, जे व्यवस्थापक धैर्यशील असतात ते संयम ठेवतात आणि स्वतःसहित स्वतःच्या उद्योग समूहाला उत्तुंग शिखरावर पोहोचवतात. श्रीसमर्थ याच समासात पुढे म्हणतात की, उदक वाहे अपरंपार । न कळे नदी कीं सरोवर ।जळवास करून नर । राहिले कितीयेक ।। उगमापैलिकडे गेले । तेथें परतोन पाहिलें ।तंव तें पाणीच आटलें । कांहीं नाहीं ।।वृतीसुन्य योगेश्वर । याचा पहावा विचार ।दास म्हणे वारंवार । किती सांगों ।। 20-21-22/07/11
याचा अर्थ असा आहे की, मायानदीला अथांग पाणी आहे. त्यामुळे ती नदी आहे की सरोवर आहे हेच कळत नाही. याचे प्रवाहीपण लक्षात न आल्याने मनुष्य फसतो. जे उगमाच्या पलीकडे पोहोचले त्यांनी मागे वळून पाहिले तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की मायानदीचे अस्तित्व संपलेले आहे. ज्याने आपली वृत्ती शून्य केली त्या थोर ज्ञानी पुरुषाच्या स्थितीचा विचार करावा. दास म्हणतात हीच गोष्ट वारंवार किती वेळा सांगावी.
व्यवस्थापनशास्त्राच्या दृष्टीने या ओवींचा अर्थ असा आहे की, व्यवस्थापनशास्त्र हे अथांग सागरासारखे आहे. याचे मूळ स्वरूप लक्षात येऊ शकत नाही. त्यामुळे या क्षेत्रातील अनेकांची फसगत होते. जे या शास्त्राला समजू शकले तेच व्यवस्थापन क्षेत्राच्या मूळ संकल्पनेच्याही पुढे पोहोचलेत. हे क्षेत्र समजून घ्यायचे असेल तर कुठल्याही परिस्थितीने किंवा कुठल्याही वृत्तीने विचलित होता कामा नये. हीच गोष्ट व्यवस्थापनशास्त्र वारंवार सांगत असते. त्यामुळे ज्याला/जिला व्यवस्थापनशास्त्राच्या मुळाशी जायचे असेल त्याने श्रीसमर्थांचे शिष्य कल्याणस्वामींप्रमाणे श्रीमददासबोधाचा अभ्यास करून गुरुसेवा करावी. तसेच भगवानविष्णूंप्रमाणे, पंढरपुरातील पांडुरंगासारखे विश्वाचे स्वरूप जाणून घेण्याकरिता कुठल्याही स्थितीत अविचल रहावे.
माधव किल्लेदार