लॉकडाऊनच्या काळात अनेक ठिकाणी उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. विजेची मागणी कमी झाली आहे. नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये म्हणून निर्बंध आले आहेत. शहरांमध्ये दुचाकीस्वारांना पेट्रोल मिळण्यावर बंदी आहे. या सगळय़ाच्या परिणामी एकूणच प्रदूषण खूप कमी झाले आहे. उत्तरेच्या कुठल्याशा शहरातून आजवर न दिसणारी हिमालयाची शिखरे स्वच्छ आणि स्पष्ट दिसू लागल्याची बातमी वाचली. पाठोपाठ सोशल मीडियावर कोणाच्या गच्चीवरून हल्ली काय स्पष्ट दिसू लागले याच्या पोस्ट्स दिसू लागल्या. पर्वतीच्या शिखरावरून अमुक पेठ स्पष्ट दिसत असेल किंवा सिंहगडावर उभे राहिले तर पुण्यातले कोणकोणते भाग स्पष्ट दिसतील असे कल्पनाविलास लोक करू लागले. सध्या खानावळी बंद आहेत. नाहीतर आमटीतला डाळीचा कण स्पष्ट दिसू लागला हा चिं. वि. जोशी यांच्या कथेतला विनोद लोकांनी स्वतःच्या नावावर खपवला असता.
प्रदूषण असो की नसो, सराईत दुचाकीस्वारांना पुढच्या चौकात लपलेला पोलीस स्पष्ट दिसतो. नवखा दुचाकीस्वार ड्रायव्हिंग लायसेन्स घरी विसरला असेल तर ती गोष्ट त्याच्या चेहऱयावर सराईत पोलिसाला स्पष्ट दिसते. एकतर्फी प्रेमात पडलेल्या कवी ह्रदयाच्या प्रियकरांना मात्र समोरची मुलगी नकार देणार आहे, कदाचित चप्पल काढणार आहे हे प्रत्यक्ष घडल्याशिवाय दिसत नाही.
मात्र लॉकडाऊनमध्ये देखील राजकारणातले प्रदूषण अजिबात कमी झालेले नाही. त्यामुळे एखादी गोष्ट एका गटाला दिसली तरी दुसऱया गटाला दिसत नाही. राहुल गांधींनी या साथीच्या रोगाबद्दल ट्विटरवर पाच सहा वेळा इशारा दिला होता. लॉकडाऊनच्या काळात बंद पडलेल्या कंपन्यांवर विदेशी भांडवलदार कब्जा करण्याची भीती आहे असा इशारा दिला होता. पण सरकारला दोन्ही इशारे दिसले नाहीत अशी त्यांच्या चाहत्यांची तक्रार आहे. सरकारने केलेली या संकटाची उत्तम हाताळणी विरोधकांना दिसत नाही अशी सरकारच्या चाहत्यांची तक्रार आहे.
मात्र या प्रदूषणाला एक अपवाद आहे. थोडय़ाच दिवसांपूर्वी पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे सराईतपणे परिस्थिती हाताळताना स्वच्छ दिसत आहेत. वर्तमानपत्रात किंवा टीव्हीवर त्यांच्या जाहिराती नाहीत. पण टीव्हीच्या पडद्यावर जेव्हा ते साध्या कपडय़ात दिसतात आणि घरगुती भाषेत बोलून सूचना आणि धीर देतात तेव्हा कुटुंबातलाच कोणी तरी माणूस आपल्याशी बोलताना दिसतो.
राजकारणात इतका साधा वाटणारा माणूस खूप दिवसांनी दिसला.