दोन्ही देशांचे सैनिक समोरासमोर : बैठक निष्फळ
वृत्तसंस्था/ लेह
भारत-चीन सीमेवर स्थिती अत्यंत तणावाची झाली आहे. चीनने पूर्व लडाखच्या पँगोंग त्सोच्या दक्षिण भागात म्हणजेच स्पांगुर गॅपमध्ये मोठय़ा संख्येत सैनिक, रणगाडे आणि तोफा तैनात केल्या आहेत. हा भाग भारतीय सैन्याच्या रायफल रेंजपासून अत्यंत नजीक आहे. चीनच्या या कृतीनंतर भारतीय सैन्य अत्यंत दक्ष आहे. तर दोन्ही देशांदरम्यान सलग 6 व्या दिवशी सैन्यस्तरीय चर्चा निष्फळ ठरली आहे.
पीपल्स लिबरेशन आर्मीने गुरुंग हिल आणि मगर हिलदरम्यान स्पांगुर गॅपमध्येही ही तैनात 30 ऑगस्टपासून सुरू केली होती. 30 ऑगस्ट रोजी भारताने चुशूलनजीक पॅँगोंग त्सोच्या दक्षिण काठावरील उंचीयुक्त भागांवर ताबा मिळविला होता.
भारतीय सैन्यानेही या भागात रणगाडे, तोफा आणि सैनिकांची तैनात वाढविली आहे. दोन्ही देशांचे सैनिक समोरासमोर आले आहेत. चीनने स्वतःची मिलिशिया स्क्वाड तेथे तैनात केली असून तिला भारतीय सैन्याला या उंचीयुक्त भागांवरून हटविण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याची चर्चा आहे. ही स्क्वाड पीएलएचे राखीव दल असून यातील बहुतांश जवान हे गिर्यारोहक, मुक्केबाज आणि स्थानिक फाइट क्लबचे सदस्य असतात. हे जवान उंचीवरील भागांमध्ये पीएलएला सैन्य मोहिमांमध्ये मदत करतात.
4 तास चालली चर्चा
पूर्व लडाखमधील तणाव कमी करण्यासाठी भारत-चीन यांच्यात सलग 6 व्या दिवशी सैन्यस्तरीय चर्चा झाली आहे, पण ती निष्फळ ठरली आहे. दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर आलेल्या ठिकाणांवरून मागे घेण्याच्या मुद्दय़ावर चर्चा झाली आहे. ही बैठक चुशूलमध्ये सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यत चालली आहे. बैठकांचे हे सत्र 7 सप्टेंबरपासून सुरू आहे. दोन्ही देशांनी आता पुढील काही दिवसांमध्ये स्वतःच्या 6 व्या टप्प्यातील कमांडर्सची बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. कॉर्प्स कमांडर-14 चे लेफ्टनंट जनरल हरिंद सिंग आणि दक्षिण शिनजियांग मिलिट्री डिस्ट्रिक्ट चीफ मेजर जनरल लियू लिन यांच्यात ही बैठक होऊ शकते.