गोवा ! भारतमातेच्या मस्तकावरील मुकूटाच्या कोंदणातील हिराच. भारताच्या एकूण राज्यांपैकी 25 वे आणि तेही देशातील सर्वात छोटे मात्र तेवढेच सुंदर आणि सर्वांनाच आपल्याकडे आकर्षित करून घेणारे हे राज्य आता आपल्या मुक्तिदिनाच्या 61 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. 61 वर्षांपूर्वी 18 डिसेंबर रोजी बेळगावच्या दिशेने, पत्रादेवी आणि दोडामार्गच्या दिशेने भारतीय सैन्याने गोव्यात प्रवेश केला व बेसावध असलेल्या पोर्तुगाल सैन्याला जाग आली खरी परंतु भारतीय सैनिकांनी तोपर्यंत गोव्याचे बरेच क्षेत्र काबीज केले आणि दि. 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा 450 वर्षांच्या पोर्तुगीजांच्या जुलूमशाहीतून मुक्त झाला. भारतीय स्वातंत्र्यानंतर गोव्याला भारतात सामील होण्यासाठी तब्बल 14 वर्षे लागली. पोर्तुगीजांनी जिथे जिथे वसाहती केल्या गेल्या त्यात गोव्याचा समावेश होता. गोवा दमण आणि दीव येथे पोर्तुगालची अमर्याद अशी सत्ता होती. गोवा पोर्तुगीजांच्या काळात कसा होता? गोवा मुक्तीनंतर तो कसा होता ! आणि आज बदलता गोवा कसा आहे हे पहाण्यासाठी गोव्याबाहेरील मंडळींना गोव्यात यावेच लागेल. 450 वर्षांचा काळ म्हणजे थोडाथोडका नव्हता. गोव्यावर अनेकांनी त्यापूर्वी राज्य चालविले होते. निजाम आणि आदिलशहांनीदेखील या प्रदेशावर राज्य केले होते. कर्नाटकातून आलेल्या कदंबने इथे सत्ता स्थापित केली होती. हसन गंगू बहामन यांनीही आपली सत्ता इथे स्थापन केली होती. निजामशाहीला हरवून पोर्तुगीजांनी गोव्यात व्यापाराच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकले आणि पोर्तुगीज इथेच स्थायिक झाले. गोमंतकीयांच्या साधेपणाचा लाभ त्याकाळी पोर्तुगीजांनीदेखील उठविला आणि इथे स्थायिक होताच कॅथॉलिक धर्मही या भूमीत रूजविला. मोठय़ा प्रमाणात हिंदू नागरिकांचा छळ करून सक्तीने धर्मांतरण केले आणि चर्चसंस्था वाढविल्या. शिक्षण आणि आरोग्य या सुविधाही इथे निर्माण केल्या. अनेक मंदिरे पाडून त्याठिकाणी चर्चेस उभारल्या. गोवा हे तसे बेटांचेच राज्य. आज बदलत्या काळात गोवा जवळपास 90 टक्केपेक्षा जास्त बेटांनी एकमेकांना पुलाद्वारे जोडला गेलेला आहे. 1961 मध्ये गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त झालेल्या गोव्याचे काय करायचे ! त्वरित आणि तातडीने भारत देशात या प्रदेशाचे विलीनीकरण केले खरे परंतु या प्रदेशाची स्वतंत्र स्वायत्तता ठेवायची कि महाराष्ट्रात विलीन करून टाकायचे? हा वाद पुढे वाढत गेला. 1961 नंतर थेट 1963 मध्ये गोवा विधानसभेसाठी पहिल्यांदा निवडणुका घेण्यात आल्या आणि गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण करू पाहणाऱया भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मगो पक्षाला घवघवीत यश मिळाले आणि पक्ष सत्तेवर आला. पहिले मुख्यमंत्री म्हणून भाऊसाहेब बांदोडकर यांचीच एकमताने निवड झाली. भाऊसाहेब म्हणजे गोमंतकीयांच्या विचारांचा खऱया अर्थाने शिल्पकार. 1963 मध्ये त्याकाळी या राज्यातील जनतेला ना कोणता राजकीय अनुभव. विकास म्हणजे नेमका काय व तो कसा असतो? याचाही पत्ता नव्हता. अशा काळात भाऊंनी गावे एकमेकांना जोडण्यासाठी रस्ते, वीज, पेयजल, गाव तिथे शिक्षण सेवेसाठी सरकारी प्राथमिक शाळा खोलल्या आणि त्याचबरोबर प्रत्येक गावात एक कुटीर रूग्णालय म्हणजेच सरकारी पातळीवर आरोग्य सुविधा सुरू केल्या. जनतेला साक्षर आणि शारीरिक सुदृढ करण्यासाठी भाऊसाहेबांनी त्याकाळात उचललेली पाऊले पुढे गोव्याला फार उपयुक्त ठरली. पुढे 1966 मध्ये जनमत कौलाद्वारे गोव्याची अस्मिता व अस्तित्व राखण्यास यश मिळाले. गोवा स्वतंत्र व सुशिक्षित झाला आणि गोव्यातील अनेक दिग्गज जे गोवा सोडून बाहेर गेले त्यांनी आपले व गोव्याचे नावही उज्वल केले. मंगेशकर कुटुंबीय असो, पणशीकर कुटुंबीय, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल कोकोडकर, पं. प्रभाकर कारेकर, पं. रामदास कामत, किशोरी आमोणकर, वर्षा उसगावकर, दिलीप सरदेसाई, पं. महादेवशास्त्राr जोशी, पं. जितेंद्र अभिषेकी, मारियो मिरांडा, दादा वैद्य, बा. भ. बोरकर असे एकापेक्षा एक नामवंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीची रत्ने गोमंतकाने दिलेली आहेत. अलिकडचेच एक रत्न म्हणजे स्व. मनोहर पर्रीकर ! एक अफलातून असा आदर्श मुख्यमंत्री जो पुढे या देशाचा संरक्षणमंत्री बनला. त्यांना आरोग्याने साथ दिली नाही हे केवळ गोमंतकाचेच नव्हे तर देशाचे दुर्दैव होते. 450 वर्षांच्या पोर्तुगीज राजवटीविरूद्ध गोमंतकीयांनी जो लढा दिला. लोकमान्य टिळकांनीदेखील गोवा व गोमतंकातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी पुण्यातून त्याकरिता चळवळ सुरू केली. आणि गोव्यात येणाऱया स्वातंत्र्यसैनिकांसाठी बेळगावला किरण ठाकूर यांचे वडील बाबुराव ठाकूर आणि माई ठाकूर यांचं घर माहेरघरच होते. गोव्याच्या स्वातंत्र्यसैनिकांची आवश्यक ती सर्व काळजी ही ही ठाकूर मंडळी घ्यायची व तेथून गोवा मुक्ती आंदोलनात ही सर्व मंडळी उडी घेत असे. गोव्याचा इतिहास हा खूप मोठा आहे. अन्याय, अत्याचाराला जनता सामोरी गेली खरी, परंतु आपला मराठी, कोकणी बाणा, संस्कृती, लोककला आणि सांस्कृतिक वारसा जतन करून ठेवला. गोव्याने 450 वर्षानंतरदेखील आपली सांस्कृतिक, परंपरा चालूच ठेवली. गोवा राज्य छोटे परंतु कीर्तीने मोठे आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या लढय़ातील एक अध्याय म्हणजे गोवा मुक्तीचा लढा आहे हे विसरून चालणार नाही. भारतीय बरोबरच पाश्चिमात्त्य संस्कृतीचे यथार्थ दर्शन हे गोव्यात आपल्याला अनुभवायला मिळते. आधुनिक गोमंतकाचा अध्याय 1980 पासून सुरू झाला. आज गोवा, देशात विकासात अग्रेसर आहे. नौदलाने आपला तात्पुरत्या तळ 1961 मध्ये गोव्यात उभारून तिथून विमानतळ सुरू केले त्या बंदर शहराच्या माथ्यावर दाबोळी हे आज आंतरराष्ट्रीय विमानतळ बनले. औद्योगिक क्षेत्रात, खाण क्षेत्रात गोव्याने उत्तम प्रगती केलेली आहे. गोमंतकाचे प्रख्यात कवी कट्टर मराठीभिमानी दामोदर अच्युत कारे यांनी म्हटलेले होते त्याचे पुनःस्मरण करावेसे वाटते
।। स्मरूनि गोमंतभूमी मूर्ती सौख्यदा । प्रेम भरे, हृदय भरे नमन तव पदा ।।