धर्मवीर संभाजी चौकातील बसथांब्यावरील अडचणींमुळे नागरिकांचा सवाल
प्रतिनिधी/ बेळगाव
धर्मवीर संभाजी चौकातील स्मार्ट बसथांब्याचे उद्घाटन करण्यापूर्वीच दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. सदर काम मागील 3 महिन्यांपासून सुरू असून, बसथांब्यावर पेव्हर्स ब्लॉक, मातीचे ढिगारे टाकण्यात आल्याने प्रवाशांना गैरसोयीचे बनले आहे. सदर स्मार्ट बसथांब्याचे काम कधी पूर्ण होणार आणि यातील अडचणी कधी दूर होणार, अशी विचारणा प्रवासी वर्गातून करण्यात येत आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहर आणि उपनगरांत स्मार्ट बसथांबे उभारण्यात आले आहेत. धर्मवीर संभाजी चौकातील घिसाडघाईने उभारण्यात आलेल्या बसथांब्यावर पावसाचे पाणी साचून घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे. रस्त्यावरील पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने बसथांब्यावर पाणी साचत होते. त्यामुळे सदर बसथांब्यावर प्रवाशांसाठी गैरसोय निर्माण झाली होती. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीच सुविधा करण्यात आली नव्हती. स्मार्ट बसथांब्याचे काम पूर्ण करून प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आले होते. पण बसथांब्यावर भटकी जनावरे ठाण मांडत असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. अशातच पावसाच्या पाण्यामुळे प्रवाशांना अडचण निर्माण झाली होती. स्मार्ट बसथांब्यावर पाणी साचल्यानंतर पावसाचे पाणी जाण्यासाठी लहान गटार करण्याचे शहाणपण स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांना सुचले आहे. सदर काम तीन महिन्यांपासून करण्यात येत आहे. या ठिकाणी घालण्यात आलेले पेव्हर्स हटवून लहान गटार बांधण्यात आली आहे. त्यावर फरशी घालण्यात आली होती. पण फरशी घातल्यानंतर पाणी कसे जाणार असा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यामुळे फरशा हटवून पाणी जाण्यासाठी जाळय़ा घालण्यात आल्या आहेत. मात्र, सदर काम संथगतीने सुरू असल्याने संपूर्ण बसथांब्यावर पेव्हर्स ब्लॉक व मातीचे ढिगारे पसरले आहेत. सदर काम तातडीने पूर्ण करून नागरिकांच्या गैरसोयींचे निवारण करण्याकडे स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांचे व कंत्राटदारांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळेच स्मार्ट बसथांबा समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. येथील विकासकामे पूर्ण होण्यास आणखी किती वर्षांचा कालावधी लागणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. बसथांब्याचे काम पूर्ण करून येथील अडथळे तातडीने दूर करण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.