माजी नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो यांच्याकडून शिर्ली येथील जागेत लागवड, प्रत्येकाने आपल्या जमिनीत स्वतःस पुरेल इतके कृषी उत्पन्न घेण्याचा संदेश
प्रसाद नागवेकर / मडगाव
कोविड-19 च्या साथीच्या या कठीण काळात चिकन, मांस व मासळी नीट उपलब्ध होत नसल्याने लोकांना भाजीपाल्याकडे वळावे लागत आहे. मात्र याबाबतीत गोवा शेजारील राज्यांवर अवलंबून असून कोरोना विषाणूचा फैलाव तेथे झालेला असल्याने तेथील भाजीपाला वापरण्याविषयी संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र गोव्यात असे असंख्य लोक आहेत की, ज्यांच्याकडे स्वतःच्या कुटुंबाला पुरेल इतका भाजीपाला पिकविण्याची जमीन आहे. प्रत्येकाने अशा प्रकारे जमिनीचा उपयोग केल्यास शेजारच्या राज्यांमधून मोठय़ा प्रमाणात भाज्या घेण्याची गरजच येणार नाही. हाच विचार करून मडगावचे माजी नगराध्यक्ष आणि शॅडो कौन्सिल फॉर मडगावचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी स्वतः भाजीपाल्याची लागवड करण्यास सुरुवात केली आहे.
वैयक्तिक वापरासाठीच्या भाज्यांचे उत्पन्न घेण्याच्या हेतूने कुतिन्हो यांनी ही लागवड केलेली आहे. ते सिव्हिल इंजिनिअर असले, तरी लहानपणापासूनच शेतीवर प्रेम आहे. ते आपल्या वडिलांसह आणि इतर भावांबरोबर सांगेतील फार्मवर कसे जायचे ते त्यांना आजही आठवते. सांगेतील फार्मवर ऊस, गंजन, मका, नाचणी, काजू, अननस, केळी इत्यादींची लागवड कशी व्हायची त्याच्या आठवणी त्यांनी सांगितल्या.
शिर्लीतील जागेत फळ-भाज्यांची लागवड
कुतिन्हो आता शिर्लीं येथील आपल्या जागेतील शेतीकडे परत वळले आहेत. एका कामगारांच्या मदतीने त्यांनी क्लस्टर बिन्स, भेंडी, वांगी, मुळा, तांबडी व पांढरी भाजी इत्यादी भाज्या आणि केळी, अननस इत्यादी फळांची लागवड केलेली आहे. सर्वांत रूचक आणि सुरक्षित खाद्य स्वतःच्या लागवडीतून मिळते. जेव्हा आपण स्वतः भाज्यांची लागवड करतो तेव्हा त्या खाण्यासाठी सुरक्षित असतील याची आपण खात्री करतो. त्यादृष्टीने केवळ सेंद्रिय खतांचा वापर केला जातो आणि घातक रासायनिक खते वापरली जात नाहीत. आपणही तसेच केलेले आहे, असे कुतिन्हो यांनी सांगितले.
आंतरिक समाधान मिळते
स्वतः लागवड केलेला भाजीपाला व फळे काढताना जो आनंद व आंतरिक समाधान मिळते ते सांगता येणारे नाही, असे कुतिन्हो म्हणाले. सर्वांनी सहजपणे लागवड करता येणाऱया भाज्या लावाव्यात आणि उत्पन्न घ्यावे असे आपले प्रामाणिक आवाहन आहे. ते व्यावसायिक पातळीवर नसावे, परंतु आपल्या कुटुंबाच्या वापरास पुरेसे असावे, असे आवाहन त्यांनी केले. अनेक जण लॉनवर मोठी रक्कम खर्च करतात. त्याच्या अर्ध्याहून कमी रक्कम छोटय़ा जागेतील फळ-भाज्यांच्या लागवडीवर खर्च केली, तर ती उपयुक्त ठरेल, असे कुतिन्हो यांनी म्हटले आहे.
लघुपटाच्या माध्यमातून संदेश
दरम्यान, आपल्याला पुरेल इतके अन्न आपणच पिकवावे हा संदेश देणारा लघुपट श्रीनिवास प्रभू यांनी तयार केला असून त्यांनी त्याचे दिग्दर्शन व लेखन केले आहे. छायाचित्रण परम अजित पै यांनी केलेले आहे. आपल्या कुटुंबाची गरज भागविण्यापुरत्या भाजीपाल्याची आपण लागवड करावी आणि आपल्या आरोग्याची आपण स्वतः काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी सदर लघुपटातून केले आहे. सदर लघुपट समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आला असून त्याला लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे.