दिवसातील सगळय़ा प्रहरांना जिच्या स्वराने अर्थ दिला होता ती लता दिगंतात विलीन झाली खरी, पण तिने अनेक जीवनांना जगण्याचे बळ दिले. मरणप्राय थंडीत बर्फाच्या थरांवर कोसो दूर फक्त पांढऱया चादरीखेरीज दुसरं काहीही दिसत नसताना हातात बंदूक घेऊन देशाचे रक्षण करणारा जवान असो किंवा रुग्णालयातील शय्येवर असह्य वेदना अनुभवणारा रुग्ण… सगळय़ांना जगण्याची उमेद देण्याचे सामर्थ्य तिच्या कंठात होते आणि आहे. लता मंगेशकर हे एका गायिकेचे नाव नाही, ते कोणत्याही गानप्रतिभेचं अत्युच्च मोजमाप आहे. लतासारखी एखादी तान जरी घेता आली तरी आयुष्य सफल झालं असं मानणारा गायिकांचा मोठा वर्ग आहे. लता मंगेशकर या सात अक्षरात सगळे संगीत सामावले आहे. अद्भूत गायकीचा आशय अंतर्भूत आहे. तमाम रसिकांचं भावविश्व बद्ध आहे. कोमल पहाटेपासून करारी माध्यान्ह आणि निवळत्या दुपारीपासून मावळत्या संध्यासमयापर्यंत, इतकेच नाही तर कभिन्न रात्रीतही तिच्या स्वरांचे चांदणे सोबतीला असते तेव्हा आपल्या हालचालीत, कृतीत चैतन्य निर्माण होते. आवाजाच्या आभासी अस्तित्वाने चित्तवृत्ती बहरून टाकणारी लता मंगेशकर हे संगीतालाच पडलेले स्वप्न तर नव्हे, असा प्रश्न पडतो. सामान्य माणसाच्या आनंद क्षणांना अधिक फुलवणारा आणि दुःखवेदनांना हळुवार फुंकरणारा तिचा स्वरमहिमा सांगायला शब्दही अपुरे पडतात. लताचे गाणे काळजाला भिडणारे तर आहेच, पण ते रसिकाच्या आत्म्याशी संवाद साधते. अशी दैवी प्रतिभा घेऊन जन्माला आलेली लता गाताना पाहणारी एक पिढी होती. तिचे गाणे गात प्रेम करणारी पिढी होती. तिच्या गाण्यावर ‘मम्मं’ करत पोसलेली, मोठी होणारी एक पिढी होती. पाच पिढय़ांना तिने मोहीत केले. रिझवले, सुखाची बरसात केली. आजी-आजोबांपासून नातू-पणतूही लताच्या गाण्याने लुब्ध झाले. मागच्या 80 वर्षांत लताच्या आवाजाने लाखो माणसे बांधली आहेत. पंडित जवाहरलाल नेहरूंसारख्या धुरंधर राजकारण्यांपासून आचार्य अत्रे-पु. ल. देशपांडेंसारख्या महान साहित्यिकांपर्यंत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, इतकेच नाही तर जगात जिथे जिथे भारतीय माणूस गेला त्या सगळय़ा ठिकाणी लताचा स्वर पोचला आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणून आपल्याला दिवस आणि रात्रीच्या चोवीस तासांचे बंधन; पण लताच्या आवाजाला कुठलेही बंधन नाही, कोणतीही मर्यादा नाही. या अर्थाने काळावरदेखील मात करणारा असा तिचा आवाज आहे. इतका कोमल, इतका हृदयस्पर्शी, काळजाला हात घालणारा आणि कधी कधी काळीज विद्ध करणारा हा स्वरोत्सव चिरकाल आपल्या सोबत राहणार आहे, यात शंका नाही. आस्तिक आणि नास्तिकांचा संघर्ष जगभरात आहे. पण नास्तिकदेखील लताच्या स्वराबाबत आस्तिक होतात आणि आस्तिकांच्या अंतःकरणात तर तिच्या स्वरांचे पवित्र स्वस्तिक निवासच करत आहे. थोडक्मयात, माणसाच्या कोणत्याही वृत्ती प्रवृत्तींवर मात करून आल्हाद निर्माण करण्याचे सामर्थ्य तिच्या आवाजात आहे. ही ताकद अभिजात आहे, अतुलनीय आहे. लता मंगेशकर देहरूपाने आता भलेही नसेल, पण तिच्या चैतन्यभारल्या स्वराने सगळीकडे ती विहरत आहे. परमेश्वराच्या आळवणीत, आईच्या जोजावण्यात, प्रेयसीच्या रुसव्याफुगव्यात, मुलांच्या सुहास्य वदनात आणि रुदनात, विवाहाच्या मंगलतोरणात, देशप्रेमाच्या पौरुषवर्णनात, अंतःकरण भारून आणि भरून टाकणाऱया संतांच्या अभंगगायनात, ‘ये हृदयीचा भाव ते हृदयी’ घालणाऱया तरुणाईच्या निःशब्दात, राखीच्या धाग्यापासून भाऊबीजेच्या बंधुप्रेमात, सख्याच्या सहनात, सखीच्या मौनात, शत्रूच्या द्रवणात, जनात आणि विजनात… लताचा आवाज कुठे नाही? लता म्हणजे परमोत्कर्षाचे बिरुद, लता म्हणजे हर्षोल्हासातील सुहृद, लता म्हणजे निरागस बालकाचे हास्य, ईश्वराच्या चरणाशी भक्ताचे असलेले दास्य आणि मोरांचे लास्य. लता म्हणजे दुःखावेगातील सहकंप, लता म्हणजे जाणिवेचा बंध आणि अनुबंध, लता म्हणजे चिरंजीव कविता ! फुले जर बोलायला लागली तर त्यांचा आवाज कसा असेल याचा कल्पनाविलास म्हणजे लता. सुगंध आपल्या परिमळाचं वर्णन करताना होणारा स्वरविलास म्हणजे लता. गाणे स्वतःच आपल्याशी गुणगुणेल तेव्हाचा श्रवणविलास म्हणजे लता. वारा स्वतःच अनुभवेल अशी स्वरझुळूक म्हणजे लता. खरे तर लता ‘अनुपमेय’ आहे. इतक्मया शब्दविलासानंही तिच्या आवाजाला पकडता येणार नाही. कोणत्याही वाक् विलासातून लताच्या आवाजाची अत्युच्च गुणवत्ता प्रकटणार नाही. लताच्या दिव्यस्वरांची अनुभूती घेण्यासाठी आत्म्याचे श्रुतीमध्ये रुपांतर करावे लागते. अनेक भारतीय भाषांमधून तिने गायन केले. ‘भारतरत्ना’लाच झळाळी देणारी लता भारतात जन्माला आली ही तमाम भारतीयांना अभिमान वाटायला लावणारी घटना. आता तिच्या जाण्यानंतर संपूर्ण विश्वाला तिने गवसणी घातली आहे. लता देहरुपाने भलेही नसेल, पण आपल्या कृतार्थ गायनाने स्वररूपात सगळय़ांच्या अंतरात आहे. जात-धर्म, देश-परदेश असल्या भेदांना झिडकारून ‘इहलोक लोभस’ करून टाकलेल्या लताची समरसता, सम्यकता कित्येक पिढय़ांना सांधून ठेवणारी आहे. डोंगरकपारीत उभे आयुष्य घालवून चिद्विलासाचा, उच्चकोटीच्या आध्यात्मिक आनंदाचा अनुभव घेणाऱया योगीपुरूषांच्या तपश्चर्येची सार्थकता लताच्या आवाजात आहे. तिचे गाणे ही साधनाच होती. ‘कोणतेही दडपण न घेता, माझ्यासह सगळे तुझे श्रोते आहेत. तेव्हा निर्भिडपणे गा,’ असा वडिल दीनानाथांचा संदेश घेऊन सोलापुरातल्या आपल्या पहिल्या जाहीर कार्यक्रमात वयाच्या नवव्या वषी गाणाऱया लताचे आरंभीचे आयुष्य काटेरी होते. पण या काटय़ाचीच सुकोमल फुले झाली आणि गदिमांच्या शब्दात सांगायचे तर, ‘ही स्वरवेल फूल होऊन हरेकाच्या ओठावर’ विलसू लागली. ऐकणारे कान आहेत तोवर लताचा स्वर चिरंतन राहणार आहे.
Previous Articleगळाभेट घेत लाखोंची कमाई
Next Article उत्तराखंडसह परिसरात 4.1 तीव्रतेचा भूकंप
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.