प्रतिनिधी/ बेळगाव
स्वर मल्हार, बेळगावतर्फे संवादिनी महर्षि पं. रामभाऊ विजापुरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित बैठकीमध्ये यशस व्ही. यांचे संवादिनी वादन आणि श्रावणी जडे यांचे बहारदार गायन संपन्न झाले. बेळगावचे सुपुत्र गायक श्रीधर कुलकर्णी आणि मनोहर वाटवे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यशसने भूपमध्ये विलंबित एकतालातील आणि त्रितालमध्ये द्रुत अशा दोन गती तयारीने सादर केल्या. त्यानंतर श्रावणी यांनी राम मारवा, राग मालगुंजी, मिश्र गारामध्ये दादरा, एक कन्नडपद आणि भैरवीने सांगता करताना भवानी दयानी ही प्रसिद्ध बंदिश सादर केली. अतिशय मुलायम, तरल, मधुर आवाज प्राप्त श्रावणी यांनी नजाकतदार हरकती, सुरेल आणि तयारीच्या भावपूर्ण गायनाने बैठक अतिशय रंजकपणे सजवून श्रोत्यांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले.
अंगद देसाई यांनी तबला तर सारंग कुलकर्णी यांनी संवादिनीची साथ दिली. रोहिणी कुलकर्णी यांनी कलाकारांचा परिचय करून दिला आणि सूत्रसंचालन व आभार मानले. स्वर मल्हार बैठकीला रसिक श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती.