केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरींचे मत : स्वस्त दरांमुळे आर्थिक समस्या
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील आगामी वर्षांमध्ये विमान उड्डाण बाजारात चांगले दिवस येण्याचे संकेत नागरिक उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी व्यक्त केले आहेत. तर विमान सेवा देणाऱया कंपन्यांकडून स्वस्त तिकीट विक्रीमुळे विमान उड्डाण बाजारात चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे स्वस्त तिकीट विक्री न करण्याचा सल्ला मंत्री पुरी यांनी यावेळी दिलेला आहे.
2018 च्या तुलनेत नोव्हेंबर 2019 मध्ये देशाअंतर्गत हवाई मार्गावर प्रवाशांची संख्या 11 टक्क्यांनी वाढली आहे. जेट एअरवेजसारखी मोठी विमान कंपनी बंद झाल्याच्या कारणामुळे ही प्रवासी संख्या चांगली राहिल्याचे सांगितले आहे. आगामी काळात विमान क्षेत्राला समाधानकारक वातावरण मिळणार असल्याचा विश्वासही यावेळी मंत्री पुरी यांनी व्यक्त केला आहे.
संकट स्थितीची निर्मिती?
काही विमान कंपन्यांच्या कमी पैशातील तिकीट विक्रीमुळे मोठी समस्या उभी राहण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. विमान कंपन्यांच्या समोर मोठी आर्थिक समस्या तयार होण्याची काळजी विमान कंपन्यांच्याबैठकी वेळी मंत्री पुरी यांनी बोलून दाखवली आहे. उदा : सरकारी विमान सेवा देणारी कंपनी एअर इंडियाचे दिल्ली-मुंबई या मार्गावर 20 वर्षांपूर्वी तिकीट दर 5100 रुपये होता. तो सध्या कमी करुन 4,600 रुपये केला आहे.
व्यावसायिक खर्च निश्चिती आवश्यक
प्रवाशांकरीता विमान उड्डाण बाजारात तिकीटांचे दर व्यावसायीक पद्धतीने लागू करण्याची गरज असून त्यासाठी विशेष नियमावली लागू करण्याची गरज असल्याचे मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटले आहे.