प्रतिनिधी/कोल्हापूर
शेतकरी आणि कारखानदारांचे लक्ष वेधलेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 20 वी ऊस परिषद आज, मंगळवारी दुपारी 1 वाजता जयसिंगपूर येथील विक्रम सिंह क्रीडांगणावर होत आहे. एकरकमी एफआरपीसह किती वाढीवर दराची मागणी होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली उसाचा दर काय असावा हे ठरवून शेतकऱयांचे हित जोपासले आहे. कायद्याप्रमाणे कारखानदारांना एफआरपी एकरकमी द्यावीच लागणार आहे. सद्य परिस्थितीचा विचार करता एफआरपीपेक्षा अधिक रक्कम देणे कारखानदारांना सहजशक्य आहे. असा दावा स्वभिमानीकडून केला आहे. त्यामुळे एफआरपी पेक्षा वाढीव रक्कम शेतकऱयांच्या पदरी कशी पडेल यासंदर्भात विचार मंथन या ऊस परिषदेच्या निमित्ताने होणार आहे. काही कारखानदारांनी स्वाभिमानीच्या भीतीपोटी एकरकमी एफआरपी देण्याचे जरी मान्य केले असले तरी वाढीव रक्कम किती देणार हे त्यांनी जाहीर करणे गरजेचे आहे.
ऊस परिषदेतील महत्वाचा सूर
-एफआरपीपेक्षा अधिक किती
-तोडणी कामगारांवर कारखानदारांचे नियंत्रण
-महापुरातील उसाची प्राधान्याने तोडणी करावी
-महापुरातील नुकसान टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाय हवा
-जाहीर केलेली कर्जमाफी तातडीने मिळावी
-मागील देणी असलेले कारखाने बंद
-2019 प्रमाण पूरग्रस्तांना नुकसान भरपाई