वीर सावरकर पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहातील स्वातंत्र्यवीर सावरकर कोठडीला बुधवारी जिल्हय़ातील हजारो शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भेट देवून वीर सावरकरांना अभिवादन केले. बुधवारी सावरकर पुण्यतिथीनिमित्त ही कोठडी सर्वासाठी भेट देण्यासाठी खुली ठेवण्यात आल्याने सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
वि. दा. सावरकर पुण्यतिथीनिमित्त जिल्हा कारागृहातील सावरकर कोठडी सर्व नागरिकांसाठी बुधवारी खुली करण्यात आली. सकाळी 9 वाजल्यापासून शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कोठडी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. एकावेळी सुमारे 100 ते 200 मुलांना रांगेत कोठडीपर्यंत सोडण्यात येत होते. कारागृहात सुरक्षेचा कोणताही प्रश्न उद्भभवू नये, यासाठी रितसर नावनोंदणी करून तपासणी करून सर्वाना आत सोडण्यात आले.
कारागृहाची शिस्त व कैद्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी कारागृह अधीक्षक आर. आर. देशमुख, तुरूंगाधिकारी अमेय पोतदार व त्यांची संपूर्ण टीम लक्ष ठेवून होते. सिंधुदुर्ग, सांगली, मुंबई येथूनही काही संस्थांचे कार्यकर्ते व सावरकर प्रेमींनी यावेळी या कोठडीला भेट दिली.
बुधवारी सावरकर पुण्यतिथीनिमित्त एक दिवस ही कोठडी सावरकरप्रेमींसाठी खुली ठेवण्यात आली होती. एकच दिवस कोठडी खुली असल्याने हजारोंच्या संख्येने येथे गर्दी झाली. यामुळे कारागृह प्रशासनाची तारांबळ उडाली, मात्र यातूनही त्यांनी नियोजन करून एका रांगेत शिस्तबध्दरित्या आलेल्या विद्यार्थी व नागरिकांना आतमध्ये सोडले.
कोठडीपर्यतच्या पर्यायी मार्गावर विचार
सुरक्षेच्या दृष्टीने सावरकर कोठडीसंदर्भात लवकरच कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहे. कारागृहांमध्ये विविध गुन्हय़ांतील कैदी असतात. अशावेळी कारागृहाच्या आतून प्रवेश दिल्यास सुरक्षेच्यादृष्टीने प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे थेट कारागृहात प्रवेश न देता बाहेरच्या बाजूने सावरकर कोठडीला भेट देण्यासाठी मार्ग तयार करण्याबाबत विचारविनीमय सुरू आहे. यासाठी कारागृह प्रशासनाशी संबधीत वरीष्ठ अधिकारी येत्या काही दिवसांत या ठिकाणी भेट देऊन याबाबतची चाचपणी करणार आहेत. तसे झाल्यास सावरकर कोठडीला सर्वानाच भेट देणे शक्य होणार आहे.