वैयक्तिक कारणास्तव येऊ शकत नसल्याचा खुलासा, चेन्नई सुपरकिंग्स प्रँचायझीला दुसरा धक्का
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आघाडीचा अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंगने यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून शुक्रवारी माघार जाहीर केली. वैयक्तिक कारणास्तव आपण यंदाच्या हंगामात खेळू शकत नाही, असे त्याने चेन्नई सुपरकिंग्स प्रँचायझीला कळवले. सुरेश रैनानंतर हंगामातून माघार घेणारा तो चेन्नईसाठी दुसरा खेळाडू ठरला.
सुरेश रैनाने संयुक्त अरब अमिरातीत पोहोचल्यानंतर मायदेशी परतणे पसंत केले तर हरभजन सिंग अद्याप भारतातच होता. हरभजनने दोनवेळा आपला प्रवास लांबणीवर टाकला आणि त्यानंतर माघारीची घोषणा शुक्रवारी केली.
वास्तविक, चौथ्या चाचणीत सर्व सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर चेन्नईच्या गोटाला दिलासा मिळाला. पण, त्याचवेळी हरभजनने संघव्यवस्थापनाला माघारीचा निर्णय कळवला असल्याचे ट्वीट केले.
दरम्यान, 13 पॉझिटिव्ह सदस्य वगळता केलेल्या अन्य सर्व सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आणि 14 दिवसांचा क्वारन्टाईन कालावधी पूर्ण केले असल्याने त्यांना सरावाची परवानगी मिळाली.
या स्पर्धेतील अन्य संघांनी क्वारन्टाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर लगोलग सरावाला सुरुवात केली. पण, चेन्नईच्या पथकातील 2 खेळाडूंसह 13 सदस्य कोरोनाबाधित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर चेन्नईच्या खेळाडूंचा क्वारन्टाईन कालावधी वाढवावा लागला आणि त्यामुळे त्यांना अन्य संघातील खेळाडूंप्रमाणे लगोलग सरावाला उतरता आले नव्हते.
आजवर तीनवेळा आयपीएल स्पर्धा जिंकणारा चेन्नई सुपरकिंग्सचा संघ विद्यमान विजेते मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर यांच्याप्रमाणे दि. 21 ऑगस्ट रोजी संयुक्त अरब अमिरातीत दाखल झाला होता. धोनीच्या नेतृत्वाखालील या संघाने त्यापूर्वी चेन्नईत छोटेखानी सराव शिबिरात सरावही केला होता. या संघाचा आधारस्तंभ असलेला रैना वैयक्तिक कारणास्तव मायदेशी परतला. पण, आपण अजूनही यंदाच्या हंगामात खेळू शकतो, असे त्याने अलीकडेच म्हटले आहे.
अन् चेन्नईचे खेळाडू सरावासाठी मैदानात उतरले!
काही दिवसांपूर्वी 2 खेळाडूंसह 13 सदस्यांना कोरोना झाल्याने पूर्ण पथकालाच क्वारन्टाईन व्हावे लागलेल्या चेन्नई सुपरकिंग्सच्या खेळाडूंना अखेर शुक्रवारी सरावासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची संधी मिळाली. चेन्नई प्रँचायझीचे सीईओ केएस विश्वनाथन यांनी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. चेन्नईतील सर्व सदस्यांचे एकूण चारवेळा चाचणी घेण्यात आली आणि त्याचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर खेळाडूंना सराव सुरु करण्याची परवानगी देण्यात आली.
समालोचन पॅनेलमधून संजय मांजरेकरला डच्चू
यंदाच्या आयपीएल हंगामासाठी बीसीसीआयने 7 समालोचकांची यादी जाहीर केली असून त्यातून संजय मांजरेकरला वगळले आहे. निवडलेल्या सात समालोचकांमध्ये सुनील गावसकर, एल. शिवरामकृष्णन, मुरली कार्तिक, दीप दासगुप्ता, रोहन गावसकर, हर्षा भोगले व अंजुम चोप्रा यांचा समावेश आहे. यापैकी दासगुप्ता व कार्तिक अबुधाबी येथे असतील तर उर्वरित सर्व जण शारजा व दुबई येथून समालोचन करणार आहेत. दुबई व अबुधाबी येथे प्रत्येकी 21 तर शारजा येथे 14 सामने खेळवले जाणार आहेत.
स्पर्धेच्या दुसऱया टप्प्यात तीन पॅनेल तयार केले जातील आणि अबुधाबी व दुबई येथील जैवसुरक्षित वातावरणात त्यांना ठेवले जाईल. मुरली कार्तिक व दासगुप्ता शुक्रवारीच अबुधाबीला रवाना होणार होते. मात्र, स्थानिक पदाधिकाऱयांनी त्यांचा क्वारन्टाईन कालावधी 14 वरुन 7 दिवसांवर आणला. त्यामुळे, ते दोघेही दि. 10 सप्टेंबर रोजी अन्य सहकाऱयांसह रवाना होतील. यंदा आयपीएल हंगामातील सामने अबुधाबी, शारजा व दुबई या तीन ठिकाणी खेळवले जाणार आहेत.