दोन्ही युवक मूळ बिहारचे डिचोलीत होते भाडय़ाने वास्तव्याला
डिचोली/प्रतिनिधी
हरवळे-सांखळी येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रावर शनिवारी 10 एप्रिल रोजी दुपारी आंघोळीसाठी आलेले दोन युवक बुडाले. एकूण तीघेजण आंघोळीसाठी या ठिकाणी आले होते. त्यातील दोघेजण बुडाले. हरवळे तीर्थक्षेत्र सध्या अशाप्रकारच्या घटनांसाठीच जास्त प्रसिद्ध होत चालले आहे. या घटना रोखण्यावर सरकारचे कोणतेच नियंत्रण नसल्याचे याठिकाणी वारंवार घडणाऱया घटनांमुळे दिसून येत आहे.
सदर घटना काल शनिवारी दु. 12 वा. च्या सुमारास घडली. मयतांची नावे गुरूभुषण कुमार (19 वर्षे) व सत्यम संजय गोंड (वय 17) अशी असून ते दोघेही मूळ बिहारचे आहेत. उपलब्ध माहितीनुसार मयत दोघेही व अन्य एकजण दुपारी हरवळे येथे आंघोळीसाठी आले होते. आंघोळीसाठी पाण्यात उतरण्यापूर्वी या तिघांनाही नदीकिनारी उपस्थित असलेल्या स्थानिक लोकांनी सदर युवकांना पाण्यात न उतरण्याचा सल्ला दिला होता. मात्र तो सल्ला या युवकांनी मनावर न घेतल्याने आंघोळीसाठी उतरण्याचे धाडस त्यांच्या जिवावर बेतले.
मयत युवक हे कुडणे येथे एका बेकरीतील सामान घेऊन दुकानांवर पुरवित होते. ते बंदरवाडा डिचोली येथे राहत होते. सध्या होत असलेल्या असह्य उकाडय़ामुळे हे युवक आंघोळीसाठी हरवळे तीर्थक्षेत्रावर आले होते. या घटनेची माहिती डिचोली पोलीस व अग्निशामक दलाला देण्यात आल्यानंतर पोलीस व दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. डिचोली अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले व पोलिसांकडे सुपूर्द केले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथे गोमेकॉत रवाना करण्यात आले. याप्रकरणी डिचोली पोलीस निरिक्षक महेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किशोर रामानंद अधिक तपास करीत आहेत.
जीवरक्षकच गायब
हरवळे तीर्थक्षेत्रावर हल्लीच्या काळात अशा प्रकारच्या घटना वाढतच चालल्या आहेत. अनेक देशी किंवा विदेशी पर्यटक या धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी आल्यानंतर त्यांना उंचावरून पडणाऱया धबधब्याची आणि पाण्याची भुरळ पडते व पर्यटक लगेच देहभान हरपून या धबधब्यावर आंघोळीसाठी उतरतात व जीव घालवून बसतात. अशा घटना हल्लीच्या काळात मोठय़ा प्रमाणात घडत असल्याने मध्यंतरी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुढाकार घेऊन जीवरक्षकांची सोय केली होती. मात्र काही दिवसानंतर सदर जीवरक्षक गायबच झाले होते. त्यानंतर य धबधब्यावर आंघोळीसाठी येणाऱयांची संख्या वाढतच होती व त्यातून बुडणाऱयांचीही संख्या वाढतच आहे. यावर सरकारने नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली जात आहे.