हरियाणा/प्रतिनिधी
हरियाणा करनालमध्ये शांतपणे निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांवर हरियाणा पोलिसांनी जबरदस्त लाठीचार्ज केला आहे. यामध्ये शेकडो शेतकरी रक्तबंबाळ झाले आहेत. कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाचे नेते आणि भारतीय किसान यूनियनचे राकेश टिकैत यांनी लाठीमारावर नाराजी व्यक्त केली आहे. हरियाणातील बसताडा टोलनाक्यावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार ही दुर्दैवी घटना असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर, ५ सप्टेंबरला मुजफ्फरनगरमध्ये होणाऱ्या महापंचायतीवरुन लक्ष विचलित करण्यासाठी सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप राकेश टिकैत यांनी केला आहे.
दरम्यान, हरियाणामधील स्थानिक आणि पंचायतीच्या निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपच्यावतीन करनालमध्ये राज्य पातळीवरील बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि इतर भाजप नेते उपस्थित होते. शेतकऱ्यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत याचा विरोध करण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आक्रमक शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग ४४ वर बसतांडा टोल नाक्यावर नाकाबंदी केली होती. शांततेच्या मार्गाने हे आंदोलन सुरु होते. दुपारी पोलीस शेतकऱ्यांची समजूत काढायला आले यावेळी तणावाचं वातावरण निर्माण झालं. त्यांनतर पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. यामध्ये अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जवरुन देशभरातून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि हरियाणा सरकारचा निषेध केला आहे जात आहे.