ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीतील महामार्ग रिकामे करण्यासाठी आंदोलक शेतकऱ्यांवर सातत्याने दबाव वाढत आहे. रेवाडीच्या खेडा सीमेवरील पेट्रोलपंप चालक आणि काही स्थानिक गावकऱ्यांनी आंदोलक शेतकऱ्यांना आज दुपारी 12 वाजता महामार्ग रिकामा करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे खेडा बॉर्डरवर शेतकरी आणि स्थानिकांमध्ये तणाव वाढला.
दरम्यान, शेतकऱ्यांना विरोध करणाऱ्या पेट्रोल पंप चालकांची लिस्ट तयार करून त्यांच्या पंपावर पेट्रोल अथवा डिझेल न भरण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. तर दुसरीकडे आंदोलक शेतकऱ्यांना बावळच्या शेतकऱ्यांची साथ मिळाली आहे. तेथील स्थानिक आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना जीवनावश्यक वस्तू पोहोचवत आहेत. या पार्श्वभूमीवर खेडा सीमेवरील 42 गावांतील गावकऱ्यांची महापंचायत उद्या (दि.30) होणार आहे.