शेतकऱयांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन : न्यायालयाचा आदेश डावलून सुपीक जमीन हिसकावण्याचा प्रयत्न सुरूच
प्रतिनिधी / बेळगाव
हलगा येथील सांडपाणी प्रकल्पाविरोधात शेतकऱयांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित आहे. तरीदेखील सांडपाणी प्रकल्प करण्यासाठी शेतकऱयांच्या जमिनी कब्जात घेण्याचा प्रयत्न अनेकवेळा करण्यात आला आहे. शेतकऱयांना विश्वासात न घेता जमीन हिसकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो थांबवावा, अशी मागणी हलगा येथील शेतकऱयांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सांडपाणी प्रकल्पासाठी अलारवाड येथील जागा घेतली होती. त्या ठिकाणी निधीदेखील खर्च करण्यात आला. मात्र अचानक हलगा येथील तिबारपिकी जमिनीवर सांडपाणी प्रकल्प करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. सुरुवातीपासून शेतकऱयांनी त्याला विरोध केला आहे. पोलिसांचे सहकार्य घेऊन जमीन कब्जात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला शेतकऱयांनी जोरदार विरोध केला होता. मात्र बेकायदेशीररीत्या शेतकऱयांची जमीन हिसकावण्याचा प्रयत्न सुरूच आहे.
आता पुन्हा काही दिवसांपूर्वी ती जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यालाही शेतकऱयांनी विरोध केला आहे. सध्या ज्या ठिकाणी सांडपाणी प्रकल्प करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत ते बेकायदेशीर आहे. याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अलारवाडजवळ कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. असे असताना पुन्हा या ठिकाणी सांडपाणी प्रकल्प करणे योग्य नाही, हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
न्यायालयाने याबाबत योग्य ती चौकशी करण्याचे आदेश अधिकाऱयांना दिले असताना चौकशी करण्याऐवजी शेतकऱयांची सुपीक जमीनच हिसकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो तातडीने थांबवावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, सुनील जाधव, सुनील खन्नूकर, दीपक किल्लेकर, प्रसाद हसबे, योगेश हसबे, धनंजय कलागती, रेखा निलजकर, तमसा हसबे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.