ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारत-चीनमध्ये तणावाचे वातावरण असताना भारतीय वायुदलाने आपली ताकद आणखी वाढवण्यासाठी रशियाकडून 33 लढाऊ विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव सरकारपुढे ठेवला आहे. हा प्रस्ताव 6000 कोटींचा असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षानंतरभारतीय सैन्याने नियंत्रण रेषेवर सैन्यांची कुमक वाढवली आहे. महासागरात आपल्या युद्धनौकांची संख्या वाढवण्यात आली आहे. तणावग्रस्त परिस्थितीमुळे तिन्ही दलांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वायुदलाने आपली ताकद आणखी वाढवण्यासाठी संरक्षण साहित्य खरेदीचा जवळपास ६००० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी पुढील आठवड्यात संरक्षण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय बैठकीत हा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
यंदा भारतीय हवाई दलातील काही विमाने अपघातग्रस्त झाल्याने लढाऊ विमानांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे रशियाकडून 21 मिग-29 आणि 12 एसयू-30 एमकेआय लढाऊ विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव हवाई दलाने ठेवला आहे.