‘निर्भया’ प्रकरण : विरोधी पक्ष-प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना गावात प्रवेशबंदी
वृत्तसंस्था/ हाथरस, लखनौ
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे दलित मुलीवर झालेला सामूहिक बलात्कार आणि मृत्यूमुळे देशात संतापाची लाट पसरली आहे. आतापर्यंत पोलिसांनी चार संशयितांना अटक केली असूनही सामूहिक बलात्काराचे वृत्त चुकीचे असल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणानंतर दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. परंतु या दरम्यान स्थानिक प्रशासन अनेक प्रकारची कठोर बंधने लादून नेते, कार्यकर्ते किंवा प्रसारमाध्यम प्रतिनिधी यापैकी कुणालाही गावात प्रवेश देत नसल्याने संताप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सरकारच्या या मनमानी कारभारामुळे उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर टीका सुरू झाली असून हाथरस प्रकरणातील सत्यता लपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला जात आहे.
सध्या हाथरस गावामध्ये कोणत्याही राजकीय नेत्याला किंवा पत्रकारांना प्रवेश करू दिला जात नाही. हे प्रकरण दडपण्यासाठी स्वत: जिल्हाधिकारीच पीडितेच्या कुटुंबीयांवर दबाव आणत असल्याचे वृत्त एका वाहिनीने दिले आहे. गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना हाथरसला जाण्यापासून रोखले होते. त्यानंतर शुक्रवारी तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांना अडवण्यात आले. त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाल्याचे समोर आले आहे. पीडित मुलीच्या गावात पोलीस प्रशासानाने घेराव घालून कुणालाही आत सोडण्यास बंदी घातली आहे. शुक्रवारी लखनौमध्ये समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी या मुद्यावरून आंदोलन केले. त्यावेळी आंदोलन करणाऱया नेत्यांवर पोलिसांनी लाठीमारही केला. अशा लाठीमार आणि अटकावाच्या घटनांमुळे वातावरण आणखीनच तप्त बनले आहे.